• Sat. Sep 21st, 2024
ठाकरेंनी शब्द दिला, ठाकरे निष्ठावंताला आता तिसऱ्यांदा डावललं..

नाशिक: २०१४ ला मोदी लाटेत निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असताना नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी दिली. पण निवडणुकीसाठी सगळी तयारी करुन बसलेल्या एका निष्ठावंत शिवसैनिकाला डावलून जाहीर झालेल्या तिकिटामुळे वातावरण तापलं. अखेर ठाकरेंनी स्वतः पुढाकार घेतला आणि निष्ठावंताची समजूत काढली. पुढे २०१९ ची निवडणूक आली आणि पुन्हा एकदा २०१४ ला जे घडलं तेच झालं. ठाकरेंनी दुसऱ्यांदा शब्द दिला आणि निष्ठावंताने तलवार म्यान करुन पुन्हा एकदा हेमंत गोडसेंसाठी आपली ताकद उभा केली. पण २०२४ ला तिसऱ्यांदाही निष्ठेचं फळ न मिळाल्यानंतर ठाकरेंचा शिवसैनिक मनापासून दुखावला.

शिवसेना फुटल्यानंतर शेकडो नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले. नाशिकसारखा बालेकिल्लाही शिंदेंनी भेदला, पण उद्धव ठाकरेंसोबत जे एकनिष्ठ राहिले त्यात एक आहेत ते विजय करंजकर. गेल्या तीन दशकांपासून कट्टर शिवसैनिक असलेल्या करंजकरांचं नाव २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेला जसं चर्चेत आलं तसंच ते यावेळीही आलंय. कारण नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना तिकीट जाहीर झाल्यापासून करंजकरांनी वेट अँड वॉचची भूमिका घेऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु केलेत. करंजकरांची स्टोरी पाहिली तर राजकारणात खरंच निष्ठेला फळ असतं का असाही प्रश्न पडतो.

विशाल पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते, त्यांचे प्रमुख नेते समजूत काढतील, सांगली आमचीच, संजय राऊतांनी ठणकावलं
विजय करंजकर जवळपास गेल्या १० वर्षांपासून जिल्हाप्रमुख आहेत. भगूर नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आल्यावर ते स्वतः नगराध्यक्ष राहिले. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक जिल्ह्यात कायम हेमंत गोडसे विरुद्ध विजय करंजकर असा संघर्ष पहायला मिळणार का अशी चर्चा होती. आक्रमक बाणा आणि दशकभरात जिल्ह्यातील संघटनावर पकड यामुळे करंजकर यांचं नाव आघाडीवर होते. २०१४ ला करंजकरांनी तिकिटासाठी प्रयत्न केले, पण ठाकरेंनी समजूत काढली व गोडसेंना तिकीट जाहीर केले. २०१९ ला ही करंजकर इच्छुक, पण ठाकरेंनी तुमच्या त्यागाची पक्ष दखल घेईल असा शब्द देऊन पुन्हा समजूत घातली. दोन्ही निवडणुकीत करंजकरांनी ठाकरेंच्या शब्दानंतर हेमंत गोडसेंसोबत वैर असूनही त्यांचा प्रचार केला. गोडसेंनी २०१४ ला भुजबळांना, तर २०१९ ला समीर भुजबळांना पाडलं.

नाशिकची जबाबदारी सध्या संजय राऊत पाहतायत आणि तिथे कुणाला संधी द्यायची याचा निर्णय हा राऊतांनीच घेतला. पण या निर्णयात करंजकरांसारखा निष्ठावंत डावलल्यामुळे त्यांचे समर्थक शिवसैनिकही नाराज झाले. अखेर करंजकरांनी आपलं म्हणणं थेट उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी भेटीची वेळ मागितली, पण त्यांना अजून बोलवणं न आल्यामुळे शिवसैनिकांमधली अस्वस्थता अजून वाढलीय. राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे एकीकडे प्रचार सुरु झालाय, तर दुसरीकडे करंजकरांसारखा डॅशिंग नेता अजूनही सायलेंट मोडवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed