• Sun. Mar 8th, 2026

    महाराष्ट्राला उष्माघाताच्या ‘झळा’, पंधरा दिवसांत १३ रुग्णांची नोंद, लक्षणं काय? कशी काळजी घ्यावी?

    महाराष्ट्राला उष्माघाताच्या ‘झळा’, पंधरा दिवसांत १३ रुग्णांची नोंद, लक्षणं काय? कशी काळजी घ्यावी?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्माघाताचा (डिहायड्रेशन) सामना करावा लागत आहे. थंड हवेतून अचानक उन्हात गेल्यामुळे या काळात विषाणूजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. ‘डिहायड्रेशन’च्या त्रासामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

    गेल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक रुग्ण बीड जिल्ह्यात आढळले आहेत. रायगडमध्ये दोन, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, धुळे, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात एक मार्च ते ३१ जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. उन्हामुळे आहार कमी होतो आणि पाणी कमी प्यायल्याने ‘डिहायड्रेशन’चा त्रास होण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिकांना डिहायड्रेशन’चा त्रास तीव्र प्रमाणात झाल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. पायांना सूज येणे, रक्तवाहिन्या गोठणे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. काही जणांना किडनीसंबंधी आजार होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे उन्हाळ्यात सर्व वयोगटांतील नागरिकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

    थंड पदार्थ खाण्याचे वाढलेले प्रमाण आणि उष्णता यामुळे सध्या लहान मुलांमध्ये घसा दुखणे, उलट्या होणे, जुलाब होणे आदी समस्या दिसून येत आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने आरोग्य विभागाने राज्यातील उष्माघाताच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

    ‘डिहायड्रेशन’ची लक्षणे

    – घसा कोरडा पडणे.
    – वारंवार तहान लागणे.
    – डोके किंवा अंग दुखणे.
    – लघवी कमी प्रमाणात होणे.
    – त्वचा कोरडी पडणे.
    – डोकेदुखी.
    – चक्कर येणे.
    – अशक्तपणा.
    Heat Stroke : उष्माघातापासून सावध राहा! तापमानात वाढ होण्याची शक्यता, कशी घ्याल खबरदारी?
    काय काळजी घ्यावी ?

    – उन्हात फिरणे टाळावे.
    – पाणी जास्त प्रमाणात प्यावे.
    – उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्री घ्यावी.
    – थंड हवेतून उन्हात जाणे टाळावे.

    गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील तापमानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ‘डिहायड्रेशन’चा त्रास होण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिकांना ‘डिहायड्रेशन’चा त्रास तीव्र प्रमाणात होण्याची शक्यता असते. पाय दुखणे, पायांना सूज येणे, रक्तवाहिन्या गोठणे या प्रकारचा त्रास त्यांना होऊ शकतो. यामुळे उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे.- डॉ. अनिकेत जोशी, फिजिशियन

    राज्यातील उष्माघाताचे रुग्ण
    वर्ष रुग्ण मृत्यू

    २०२२ ७७६ ३१
    २०२३ ३१९१ २२
    २०२४ १३ ०

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed