नागपूर, दि. ४ : तंत्रज्ञानाची प्रगती होत असतानाच आज विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे आजच्या एआय युगात ‘फॅक्ट चेक’ अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.पी. सिंग यांनी केले. माहिती व जनसंपर्क विभागातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित ‘संवाद’ उपक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माहिती व जनसंपर्क संचालक डॉ. गणेश मुळे होते.
तंत्रज्ञानातील प्रचंड वेगवान बदलांकडे लक्ष वेधून श्री. सिंग म्हणाले की, या प्रगतीचा गैरफायदा घेऊन लोकांना गंडविण्याचे, समाजा- समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ही तंत्रज्ञानातील प्रगतीची काळी बाजू आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे आहे. त्याचा उपयोग अतिशय सावधपणे करावा लागतो. दंगलीसारखे प्रकार घडले की लगेच त्या परिसरात इंटरनेट बंद करण्यात येते. कारण ते सुरू राहिले तर अफवा पसरवून आगीत तेल होण्याचे प्रकार घडतात. मुळात या प्रकारांमुळे विश्वासार्हताच धोक्यात आली आहे. एआय कितीही प्रगत झाले, तरी ते त्यात मानवी भावना असणार नाही. त्यामुळेच त्याचा उपयोग करताना डोळे, कान उघडे ठेवले पाहिजे. समाजमाध्यमातून आपल्यापुढे जे येते त्याचे सत्य तपासून पाहिले नाही, तर मोठे नुकसान होऊ शकते, असेही श्री. सिंग यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय समारोपात संचालक डॉ. गणेश मुळे यांनी फॅक्ट चेक नव्या माहिती प्रसारणात गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
प्रारंभी माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी श्री. सिंग यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन सहायक माहिती संचालक पल्लवी धारव यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मानले.
000
