• Sat. Sep 21st, 2024
महापालिकेचा मनमानी कारभार, ‘वंचित’कडून ३० हजार पाणीबिलांची ‘होळी’

म. टा. वृत्तसेवा, अकोला : महापालिकेने शहरवासीयांना दिलेल्या ३० हजार पाणीपट्टी देयकांची रविवारी वंचित बहुजन आघाडीकडून होळी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ यांच्याहस्ते सिव्हील लाइन्स चौकात सायंकाळी ही होळी झाली.महानगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या घरगुती नळ कनेक्शनवर मीटर बसविले. या मीटरचे रीडिंग घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची होती. परंतु संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे सहा महिने रीडिंग घेतले गेले नाही. काही भागात कधीही रीडिंग घेतले गेले नाही. काही ठिकाणी तर अवैध नळ कनेक्शन देण्यात आले. महानगरपालिकेने मनमानी पद्धतीने नागरिकांना पाणीपट्टी देयके देण्यात आली. कंत्राटदाराकडून मनमानी पद्धतीने देयके वाटून वसूलही केली जात आहेत.
तापमानाच्या पाऱ्याचा चढता क्रम; राज्याला पुन्हा चटके, पुढील पाच दिवस हवामान कसे राहील?
देयके न भरल्यास नळ जोड्यया तोडण्यात आल्या, असा आरोप वंचितने केला आहे. याबाबत महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी अनेक सभांमध्ये तक्रारी केल्या, आवाज उठविला. वंचित बहुजन आघाडीच्या या मनमानीविरोधात अनेकदा निवेदने दिली. तरीही हे थांबविण्यात न आल्याने पाणीपट्टी देयकांची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर, अशोक सोनोने, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद दंडवे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed