शिवसेना पक्षाचे सगळेच प्रमुख पदाधिकारी महायुतीचा घटक म्हणून उपस्थित राहणार असून त्यात शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार शरद सोनवणे, भगवान पोखरकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मात्र ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार नसल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. लांडेवाडी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, माझा पक्ष प्रवेश हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालय येथे होणार आहे. यावेळी माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा सभेत होणे अपेक्षित नाही. फक्त उद्या माझा पक्ष प्रवेश होणार आहे. ज्यावेळी दिल्लीतून ग्रीन सिंगल येईल त्यावेळी सर्व महायुतीच्या उमेदवारांची नावे समोर येणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.
आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेश केल्याने स्थानिक पदाधिकारी त्यांच्यासोबत येतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. जर ते आढळराव यांच्या सोबत राष्ट्रवादीत आले तर शिंदे शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने अनेक राजकीय गणित बदलणार असून स्थानिक राजकारणावर देखील याचा परिणाम होईल, असे बोलले जाते.
‘बदला घेण्यासाठी निवडणूक रिंगणात’
‘माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा नसून ते केवळ मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक ‘बदला विरुद्ध महाराष्ट्राची अस्मिता’ अशी आहे,’ या शब्दांत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शनिवारी पुन्हा आढळरावांना टोला लगावला.