• Wed. Mar 11th, 2026

    मुंबई-डहाणू लोकल फेऱ्या अपुऱ्या! दररोज रेटारेटीत प्रवास; नव्या वेळापत्रकात चर्चगेट, विरार फेऱ्या वाढणार का?

    मुंबई-डहाणू लोकल फेऱ्या अपुऱ्या!  दररोज रेटारेटीत प्रवास; नव्या वेळापत्रकात चर्चगेट, विरार फेऱ्या वाढणार का?

    Western Railways: पश्चिम रेल्वेच्या विरार, चर्चगेट, वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवासी संख्या वाढली आहे. पण लोकल फेऱ्या अपुऱ्या पडत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

    म. टा. वृत्तसेवा, पालघर: पश्चिम रेल्वेच्या डहाणू विभागात डहाणू लोकल सेवा सुरू होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत वैतरणा ते डहाणूदरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून ती सातत्याने वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये पालघर, केळवे रोड, सफाळे व वैतरणा येथील प्रवाशांना गाडीत चढणेही कठीण होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.

    यासंदर्भात सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली असून, त्यांच्यासोबत चर्चाही झाल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत केवळ सकारात्मक आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय अद्याप झालेला दिसत नाही, अशी प्रवाशांची भावना आहे.

    Maharashtra TimesTMT Buses: प्रवासी सर्वाधिक पण बस अपुऱ्या, ‘टीएमटी’मधून दररोज अडीच लाख नागरिकांचा प्रवास; घोडबंदर रोड, कळव्यापर्यंत सेवा

    दरम्यान, या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची मागणी होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांच्या अडचणींबाबत निवेदने देणे; तसेच संसद आणि विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. प्रवाशांच्या समस्या समजून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रवाशांशी संवाद साधावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

    प्रवाशांची नव्या वेळापत्रकात वाढीची अपेक्षा

    सध्याच्या परिस्थितीत डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी मागणी पुढे येत आहे. १ एप्रिलपासून उपनगरी लोकलचे नवे वेळापत्रक लागू होणार आहे. या वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, तसेच १५ डब्यांची लोकल सुरू करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesBike Taxi: आता रॅपिडो, ओला, उबरची बाईक सेवा बंद? ‘बाइक टॅक्सी’ कंपन्यांचे परवाने तात्पुरते रद्द; परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा

    १५ डब्यांच्या लोकलचीही मागणी

    ‘डहाणू-चर्चगेट, डहाणू-दादर, डहाणू-अंधेरी, डहाणू-विरार आणि डहाणू-बोरिवली या मार्गावरील लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच १५ डब्यांची लोकल सुरू झाल्यास प्रवाशांना चढउतार करणे सुलभ होईल, प्रवासातील त्रास कमी होईल आणि रेल्वेवरील ताणही काही प्रमाणात कमी होईल. मात्र या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे,’ असे डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेचे सचिव दयानंद पाटील यांचे म्हणणे आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा