राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांनी तीन तर शरद पवार यांनी एका जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांबाबत दिल्लीत बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
- सोलापूर – प्रणिती शिंदे
- गडचिरोली- नामदेव किरसांड
- कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
- अमरावती- बळवंत वानखेडे
- नंदुरबार- गोवाल पाडवी (केसी पाडवी यांचे चिरंजीव)
- पुणे – रवींद्र धंगेकर
- चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर/विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीत १५ जागांवर तिढा कायम आहे. यामध्ये सोलापूरच्या जागेचा समावेश आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर केला. त्याच पद्धतीने वंचितने सोलापूरच्या जागेवर दावा केला असला तरी तेथे काँग्रेसने प्रणिती शिंदे यांचे नाव फायनल केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम बैठक २१ मार्चला
२१ मार्चला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपाची अंतिम चर्चा होऊन फॉर्म्युला जाहीर करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीचा तिढा २१ मार्चला सुटणार?
उद्धव ठाकरे यांनी २३, काँग्रेसने १८ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० जागांवर दावा केला आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही ५ जागांची मागणी केली आहे.
