संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंगळवारी ही माहिती देण्यात आली. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय समन्वयिका अॅड. स्मिता कांबळे, कॉंग्रेसचे माजी आमदार सुनील केदार, अॅड. आकाश मून, प्रितम बुलकुंदे, अमन कांबळे व इतर उपस्थित होते. केदार यांनीही बॅलेटवरच निवडणूका घ्याव्यात, या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.
इव्हीएम मशीनविरोधात देशभर मोठया प्रमाणात लढा सुरू आहे. मतपत्रिकेवर अर्थात बॅलेटवर निवडणूका व्हाव्यात यासाठी नागपूरसह देशात प्रयत्न होत आहेत. विविध संघटना त्यासाठीचे आंदोलन करीत आहे. न्यायालयात पाठपुरावाही होत आहे. मात्र, न्यायपालिकेकडून तसा निर्णय होत नसल्याने हतबल न होता, यासाठी पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे ४०० उमेदवार उभे झाल्यास इव्हीएमची कमतरता भासेल व मतपत्रिकांवरच निवडणुका घ्याव्या लागतील, अशी भूमिका यावेळी ॲड. कांबळे यांनी मांडली.
…तरच मतपत्रिकांवर मतदान
प्रत्येक ईव्हीएमला एक कंट्रोल युनीट असते. यावेळी निवडणूक आयोगाने एम ३ ईव्हीएम मशीन आणल्या असून हे मशीन सहज हॅक होऊ शकते, असा दावा संघटनेने केला आहे. या मशीनला जास्तीत जास्त २४ बॅलेट युनिट जोडल्या जाऊ शकतात. एका बॅलेटवर १६ उमेदवारांचे नाव असते. याप्रमाणे २४ बॅलेटवर ३८४ उमेदवार येतात. उमेदवारांची संख्या ३८४ हून अधिक झाल्यास निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर निवडणूका घ्याव्या लागतील. हाच ‘इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम’ चा प्रयत्न आहे, असे यावेळी अॅड. मून यांनी सांगितले.
