रायगडमधील रेवस-रेड्डी मार्गावर प्रशासकीय निष्काळजीपणामुळे वनरक्षक सुरज सारंगे यांचा भीषण अपघात झाला. नुकतेच जुळ्या अपत्यांचे बाबा बनलेल्या सारंगे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.
अपघात कसा घडला?
मुरूड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागाच्या तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदून ठेवलेल्या मोरीत त्यांची मोटारसायकल अचानक कोसळली. खड्डा खोल असल्याने दुचाकीचा तोल जाऊन सारंगे खाली पडले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही तासांत आनंदाचे रूपांतर शोकात
या घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुरज सारंगे यांना जुळे अपत्य झाले होते. शुक्रवारीच ही दोन्ही बाळे हॉस्पिटलमधून घरी आली होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. या आनंदाचा क्षण त्यांनी आपल्या मोबाईल स्टेटसवरही व्यक्त केला होता. मात्र काही तासांतच नियतीने क्रूर घाला घातल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. जुळ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करणाऱ्या कुटुंबाला त्यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला आहे.
Dombivli Crime : ‘तू 18 ची झालीस की लग्न करु…’; अल्पवयीन मुलीशी तीन वर्षे संबंध; वय पूर्ण झाले, लग्न करतानाच अरमान शेखला Pocso खाली अटक
रस्त्यावरील निष्काळजीपणाचा आरोप
दरम्यान, रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेला खड्डा तसेच उघडी मोरी योग्य प्रकारे सुरक्षित करण्यात आली नव्हती. त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या किंवा रात्री वाहनचालकांना दिसण्यासाठी लाल दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा अपघात निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे.
कारवाईची मागणी
या घटनेनंतर महाराष्ट्र वनरक्षक–वनपाल संघटना, शाखा अलिबागचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्था न ठेवल्यामुळे एका कर्तव्यदक्ष वनरक्षकाला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
Supriya Sule: अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा; पण निधी कुठे? नीरा-कऱ्हा प्रकल्पावर सुप्रिया सुळे यांचा सवाल
वनविभागात शोककळा
सुरज सारंगे हे कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने वनविभागातील सहकारी तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. जुळ्या अपत्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्याआधीच कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
