अमित शहांनी ५ मार्चच्या रात्री सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा केली. त्या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. शहा आणि फडणवीस आणि अजित पवारांशी बोलले. त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. ते निघून गेल्यानंतर अमित शहांनी मुख्यमंत्री शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. या बैठकांमध्ये बहुतांश जागांचा प्रश्न निकाली निघाला आहे. पण महायुतीनं अद्याप तरी जागावाटप जाहीर केलेलं नाही.
जिंकण्याची क्षमता हाच जागावाटपाचा मुख्य निकष असेल, असं अमित शहांनी मित्रपक्षांना बैठकीत स्पष्टपणे सांगितलं. तुमच्या पक्षाला मिळणारी मतं युतीतील मित्रपक्षांना मिळतील याकडे कटाक्षानं लक्ष द्या, अशी सूचना शहांनी केली. या बैठकीत शिंदेंनी काही मुद्दे मांडले. ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा माझ्या पक्षाचे उमेदवार चांगल्या स्थितीत आहेत. मुंबईतील ज्या जागांवर ठाकरेंची शिवसेना लढत आहे, तिथे शिवसेनेचे उमेदवार चांगल्या स्थितीत असतील, असं शिंदेंनी शहांना सांगितलं.
शहांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी एक शक्यता बोलून दाखवली. मुंबईतील जागांवर जिथे ठाकरेंची शिवसेना आणि माझा पक्ष अशी लढत होत आहे, त्या सगळ्या जागांवर शिवसेनेची मतं भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कदाचित ट्रान्सफर होणार नाहीत, अशी शक्यता शिंदेंनी वर्तवली. त्यावर मित्रपक्षांची मतं एकमेकांना मिळतील यासाठी सगळ्या पैलूंचा विचार केला जाईल, असं शहा म्हणाले.
कोणाला किती जागा?
भाजप ३२ ते ३७ जागा लढवण्याच्या विचारात आहे. त्यांच्याकडे ३५ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी तयार आहे. मित्रपक्षांना केवळ ११ ते १६ जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. त्यामुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. माझ्यासोबत १३ खासदार आहेत. त्यांना तिकिट देता यावं यासाठी शिवसेनेला किमान १३ जागा सोडा. त्यांची तिकिटं कापू नका, अशी विनंती शिंदेंनी शहांसोबत झालेल्या बैठकीत केली होती.