• Sat. Sep 21st, 2024
उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या आता थेट साडेचारशेच्या पार गेली आहे.

आता लातूरचा समावेश


या आठवड्यात टँकरग्रस्त जिल्ह्याच्या यादीत लातूरचाही समावेश झाला असून, तेथील एका गावाला एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशीव हे जिल्हे सुदैवाने अद्यापही टँकरमुक्त आहेत.

पाणीटंचाईचा प्रश्न कायम

गेल्या उन्हाळ्यापासून छत्रपती संभाजीनगरसह विभागातील अनेक जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात व त्यानंतर काही प्रमाणात टँकरच्या संख्येत घट झाली होती. विभागातील अनेक जिल्हे टप्प्याटप्प्याने टँकरमुक्त झाले; परंतु छत्रपती संभाजीनगर, जालना त्यास अपवाद ठरले. सर्वदूर दमदार पाऊस नसल्याने या जिल्ह्यांत पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहिला. परिणामी, कायमस्वरूपी पाण्याचे स्रोत नसलेल्या; तसेच पाणीपुरवठा योजना नसणे वा बंद असलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला.

बीडमध्येही टँकर

छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाच गेल्या काही आठवड्यांपासून बीड जिल्ह्यातील एका गावातही टँकर सुरू झाले आहेत. त्यापाठोपाठ आता टँकरग्रस्त जिल्ह्यात लातूरचाही समावेश झाला आहे. दुसरीकडे, उन्हाची तीव्रता वाढू लागताच तहानलेल्या गावांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे चित्र आहे. १५ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील मिळून एकूण १९७ गावे, ५८ वाड्यांना ३१९ टँकरद्वारे पाणी केला जात होता. आजघडीला लातूरसह या जिल्ह्यातील एकूण २७६ गावे व ७८ वाड्यांना ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

निधी मिळूनही पाणी नाही, संतप्त महिलांचा मोर्चा, सरपंचांसह सदस्यांना ग्रामपंचायतीतच कोंडलं

छत्रपती संभाजीनगरात २६९ टँकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद व सोयगाव या दोन तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व तालुक्यात टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण असूनही या तालुक्यातील ३५ गावे व आठ वाड्यांना सध्या ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३८ गावे व १२ वाड्यांना मिळून ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील २० गावे व एका वाडीला २६, गंगापूर तालुक्यातील २० गावे व चार वाड्यांना मिळून ५१ टँकरद्वारे; तसेच वैजापूर तालुक्यातील २८ गावे व चार वाड्यांना एकूण ३७ टँकरद्वारे, कन्नडमधील सात तहानलेल्या गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील २१ गावे व सात वाड्यांना मिळून ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशी जिल्ह्यातील एकूण १६९ गावे व ३६ वाड्यांना २६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

इतर जिल्ह्यांची स्थिती

जालना जिल्ह्यातील केवळ परतूर तालुका टँकरमुक्त असून, उर्वरित तालुक्यातील एकूण १०५ गावे व ३९ वाड्यातील ग्रामस्थांना १७८ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. भोकरदन तालुक्यात ४३ टँकर सुरू आहेत. जालना तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या ४०च्या घरात आहे. बीड तालुक्यातील गेवराई तालुक्यातील एक गाव, तीन वाड्यांना दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. विभागातील इतर जिल्हे टँकरमुक्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed