• Wed. Mar 11th, 2026
    कमळावर लढणाराच जिंकेल, दक्षिण मुंबईवरुन शिवसेना-भाजपात रस्सीखेच? शिंदेंची धाकधूक वाढली

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. गेल्या लोकसभेला शिवसेना-भाजपने युतीत लढताना मुंबईत प्रत्येकी तीन-तीन जागा लढवल्या होत्या. मात्र आता भाजप मुंबईतील पाच मतदारसंघ लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना- भाजपमध्ये रस्सीखेच होत असल्याची माहिती आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मुंबईतील उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य या दोन मतदारसंघातील खासदार सहभागी झाले आहेत. उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. परंतु युतीत दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे असली, तरी सध्या तिथले खासदार अरविंद सावंत हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे भाजपने या मतदारसंघावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
    धनुष्यबाण नाही, तर कमळावर लढण्याची तयारी; पण तिकीट द्या, बारा खासदारांचं शिंदेंना साकडं
    दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेने भाजपला सोडावी, असा पक्षाचा आग्रह आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट नकार आहे. ठाकरे गटातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना तगडी टक्कर देण्यासाठी शिंदे गटात काही उमेदवार उत्सुक आहेत. मुंबई महापालिकेती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेले आणि राज्यसभेवर गेलेले खासदार मिलिंद देवराही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
    भाजप ‘खूपच मोठा’ भाऊ! राज्यात ३७ जागा लढण्याचे संकेत, मुंबईत ५ मतदारसंघांवर डोळा, शिंदेंना काय?
    दक्षिण मुंबईत वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत यापैकी तीन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. पैकी एक आमदार शिंदे गटात आणि दोन आमदार ठाकरे गटात आहेत. तर उर्वरित तीन आमदारांपैकी दोघे भाजपचे, तर एक काँग्रेसचा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल असल्याचा दावा केला जात आहे.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    दरम्यान, भाजपच्या तिकिटावर अर्थात कमळ चिन्हावर या मतदारसंघातून उमेदवार लढला, तर तो जिंकेल, असा सर्व्हेतील निष्कर्ष असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपकडून मंत्री मंगलप्रभातलोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असे दोन बडे आमदार तयारीत असल्याचं बोललं जातं. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मध्यमवर्गीयांसोबत उच्चवर्गीय मतदारही आहे. युवा आणि महिला वर्गाचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती आहे. याशिवाय रा स्व संघाकडूनही इथे चाचपणी झाली असून उमेदवार कमळावर लढल्यास विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा पराभव होऊ शकतो, असं समोर आल्याचं बोललं जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed