• Thu. Mar 12th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar : गॅस टंचाईचा फटका ; हॉटेल-केटरिंग व्यवसायावर ‘दुसऱ्या करोना’सारखी वेळ, डझनभर हॉटेल बंद

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळी बंद पडू लागल्या आहेत आणि शहरातील किमान १० ते १२ हॉटेल बंद झाले आहेत व पुढील दोन दिवसांत निम्मे हॉटेल बंद होऊ शकतात अशी स्थिती आहे. त्याचवेळी लाकडासह इंडक्शन भट्टीचा वापर करुन लग्नतिथी किंवा इतर सभा-समारंभाचे पूर्वीच घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी केटरिंग व्यावसायिकांकडून शर्थ लढवली जात आहे. मात्र यात कितीतरी जास्त अडचणी येत आहेत व अशी कसरत पुढच्या काही दिवसानंतर शक्य होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

    गॅस तुटवड्याच्या फटक्याने गंभीर स्थिती ओढावली आहे व हॉटेल, खानावळी तसेच केटरिंग व्यवसायाचे चक्र थंडावल्याचे स्पष्ट झाले आहे. गॅसअभावी मागच्या दोन दिवसांत शहर परिसरातील किमान १० ते १२ हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडले आहेत. तर, सध्या सुरू असलेल्या बहुतेक हॉटेल, खानावळींमध्ये मोजक्या एक किंवा दोन दिवसांचा गॅस शिल्लक आहे व हा शिल्लक साठा संपल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त हॉटेल, रेस्टॉरंट, खावानळी बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुन्हा बहुतेक सर्वच हॉटेलांमध्ये इंडक्शन तसेच लाकडाच्या भट्टीचा वापर सुरू झाला आहे. त्याचवेळी हॉटेलांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ निम्म्यापेक्षा कमी झाले आहे व मोजक्या पदार्थांसह हॉटेल, रेस्टॉरंट व खानावळी चालवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. या संदर्भात हॉटेल व्यावसायिक किशोर शेट्टी म्हणाले, आमच्याकडे आता फक्त दोन दिवसांचा गॅसचा साठा आहे व त्यानंतर हा साठा शून्यावर येणार आहे. हा साठा शून्य झाल्यानंतर इंडक्शन भट्टीच्या आधारे मोजके खाद्यपदार्थ देण्याचा प्रयत्न केला जाईल. दैनंदिक ग्राहक, कर्मचारी, विद्यार्थ्यांची गौरसोय होऊ नये म्हणून मोजक्या पदार्थांसह हॉटेल सुरू ठेवण्याचा प्रयत्न असेल. मात्र एरवी उपलब्ध केले जाणारे २०० ते २०० खाद्यपदार्थ उपलब्ध करणे नक्कीच शक्य होणार नाही, असेही शेट्टी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

    जास्त वेळेत कमी स्वयंपाक

    पूर्वी घेतलेल्या ऑर्डर कशा-बशा पूर्ण करण्यासाठी अगदी कसरत करावी लागत आहे, असे सांगताना केटरिंग व्यावसायिक राजेश कुलकर्णी म्हणाले, केवळ पूर्वी काम घेतले आहे व शब्द पाळण्यासाठी हे काम केले जात आहे. वस्तुत: गॅस उपलब्ध नसल्याने लाकडावर तसेच इंडक्शनच्या भट्टीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मात्र अशा प्रकारे जेवण तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. धुराचा त्रासही वाढला आहे आणि जास्त वेळ लागून कमी माणसांचा स्वयंपाक तयार होत आहे. वेळ जास्त लागत असल्याचे मजुरीचा खर्च दीडपटीने वाढला आहे. अशी ही पद्धत खूप दिवस चालू शकत नाही, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच काही तरी ठोस निर्णय घ्यावा लागेल व संघटनेच्या मार्फत हा निर्णय होईल, असेही त्यांनी नमूद केले.Pune Crime : रूममेट्सच्या मानसिक त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीनं जीवन संपवलं; तिघींविरुद्ध गुन्हा दाखल

    कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

    या स्थितीमुळे विवाह सोहळे किंवा इतर कार्यक्रम-उपक्रम सध्या तरी पुढे ढकलण्यात आले नसले तरी पुढच्या टप्प्यात ही वेळ येऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ही स्थिती बदलली नाही तर विवाह सोहळे व इतर मंगल कार्यालये, कार्यक्रम थोडक्यात उरकून घेण्याकडे कल वाढू शकतो, असेही सांगितले जात आहे.

    जोपर्यंत गॅस उपलब्ध आहे तोपर्यंतच हॉटेल-रेस्टॉरंट सुरू राहू शकतात. त्यामुळे अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. इंडक्शनच्या भट्टीवर काय देता येऊ शकेल, याचा विचार सुरू असून, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांना सेवा दिली जाईल.
    -शिवाजी पाटील, अध्यक्ष, जिल्हा हॉटेल, रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन

    Maharashtra TimesRaigad News : सस्पेन्स संपला, रायगडमध्ये महायुतीचं जुळलं, अखेर तीनही पक्ष एकत्र, ZP अध्यक्ष भाजपचा होणार, काय-काय घडलं?

    सध्या घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करण्याच्या हेतुने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र जिथे ५०० व्यक्तींचे जेवण अपेक्षित आहे, तिथे १५०-२०० व्यक्तींचे जेवण तयार करणे शक्य होत आहे व ग्राहक ही अडचण समजून घेत आहे. या स्थितीमुळेच १५ दिवसानंतरच्या ऑर्डरसाठी कुठलाही शब्द देणे सध्या तरी शक्य नाही.
    -महेश लाहोटी, शहर अध्यक्ष, केटरिंग संघटना

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *