• Sat. Sep 21st, 2024

भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने – केंद्रीय मंत्री अमित शाह

ByMH LIVE NEWS

Mar 6, 2024
भारताचा विकास सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाने – केंद्रीय मंत्री अमित शाह

मुंबई, दि. 6 : मागील काही वर्षांत भारताचा वेगाने विकास झाला आहे. या विकासात सरकारच्या महत्त्वाकांक्षेबरोबरच नागरिकांच्या आत्मविश्वासाचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी आज मुंबईत आयजीएफ वार्षिक गुंतवणूक शिखर परिषद – एनएक्सटी 10 ला संबोधित केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री. शाह म्हणाले, केंद्र सरकारने 2047 या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंतचा विकासाचा आराखडा तयार केला आहे. मागील 10 वर्षांच्या काळात 50 हून अधिक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे भारताची दिशा आणि स्थिती बदलल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर, नॉन परफॉर्मिंग असेटसची समस्या सोडवणे, जन-धन-आधार-मोबाईलच्या रूपात डिजिटल व्यवहारांची व्याप्ती प्रत्येक व्यक्तीपर्यंत वाढवणे, भविष्यातील भारत आणि आपली मूल्ये या दोन्हीचा समावेश असलेले नवीन शैक्षणिक धोरण असे अनेक निर्णय घेतले. सर्जिकल आणि हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या सुरक्षेला कोणीही बाधा पोहोचवू शकत नाही, असा संदेश भारताने जगाला करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबई शेअर बाजाराचा 22 हजारांवरून वाढत 73 हजारांवर पोहोचलेला निर्देशांक हा आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचे मोठे द्योतक आहे असे केंद्रीय मंत्री श्री.शाह यांनी नमूद केले. प्रत्यक्ष करदात्यांची संख्या 8.18 कोटी झाली असून अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या वाढून 1 कोटी 40 लाख झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ष 2027 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणे, 2030 पर्यंत दोन ट्रिलियन डॉलर्सची निर्यात, 2025 पर्यंत अंतराळ स्थानक उभारणे, 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे, 2040 मध्ये चंद्रावर मानव पाठवणे आणि 2047 पर्यंत पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून विश्वगुरू बनण्याचे देशासमोरील उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed