• Sat. Sep 21st, 2024
Sanjay Raut: जे तुरुंगात हवेत, ते निवडणूक रिंगणात; हीच का मोदी गॅरंटी? संजय राऊतांचा सवाल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘ज्यांना तुरुंगात टाकायला हवे त्यांना भाजप उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायचे होते, त्यांना राज्यसभेवर घेतले,’ ही मोदी गॅरंटी असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी नाशिकमध्ये केली. ‘भाजपने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत १९५पैकी ७०च्या आसपास लोक कृपाशंकर सिंहांसारखे आर्थिक घोटाळ्यांमधील आहेत. उरलेल्या यादीतही मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे लोक असून, भाजपकडे स्वत:चे असे काय आहेस’ असा खोचक सवाल राऊत यांनी या वेळी उपस्थित केला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘कृपाशंकर सिंह, अजित पवार व अशोक चव्हाण या तिघांनाही तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस करीत होते. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, गैरमार्गाने मिळविलेली संपत्ती अशा स्वरूपाचे आर्थिक गुन्हे सिंह यांच्यावर दाखल असून, त्यांना तुरुंगात पाठविण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती; परंतु तुरुंगात न पाठवता आज सिंह यांना वाराणशीजवळील जौनपूर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ही मोदी गॅरंटी आहे,’ अशी टीका राऊत यांनी केली. ‘शिखर बँकेत अजित पवारांनी सुमारे ४० हजार कोटींचा घोटाळा केला, असे फडणवीसांचे म्हणणे होते. पवारांना ते तुरुंगात पाठविणार होते, त्याचे काय झाले,’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

कृपाशंखर सिंह यांच्यावर आरोप केले, त्यांचंच भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव | उद्धव ठाकरे

‘यानंतर देशात हुकूमशाही’

‘हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या प्रवाहात सामील व्हायला हवे, ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे. आंबेडकर जेथे जातात तेथे जोरदारपणे संविधान रक्षणाची भूमिका मांडत आहेत. लोकही त्यांना प्रतिसाद देत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी, नाना पटोले, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी देशात २०२४ला परिवर्तन आणायचे ठरविले आहे. कारण ही या देशातील शेवटची निवडणूक असणार आहे. यानंतर देशात खऱ्या अर्थाने हुकूमशाहीला सुरुवात होईल,’ अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed