• Wed. Mar 11th, 2026

    दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार

    दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.उंबर्ले गावात ‘गाढवाचा खडक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच ते सहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो. बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले.

    मंडणगड तालुक्यातील गोठे, धामणी, बोरखत, वेरळ या चार गावांच्या सीमेवरील वाघाचा कातळ या ठिकाणी आढळून आलेल्या कातळशिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्नावस्थेत असल्याने तो डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे. मंडणगड तालुक्यात आजवर कातळशिल्पांची नोंद झालेली नव्हती. मात्र सावित्री नदीच्या दक्षिण काठावरील गावांच्या सड्यावर हे उल्लेखनीय शिल्प आढळल्याने अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे. माणूस शिकारी अवस्थेत, भटक्या वृत्तीचा होता, त्या काळातील त्याच्या बुद्धीचा आवाका आणि उपलब्ध साधनांआधारे ही चित्रे त्याने कोरली. अशाच पद्धतीची आणखी कातळशिल्पे या परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

    बारावीचे पेपर संपण्याआधी बापाने लेकीला संपवलं, तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर हादरलं, कारण काय?

    कातळशिल्पे ही कोकणात केवळ जांभ्या सड्यावर आढळली आहेत. कोकणातील कातळशिल्पे अश्मयुगीन काळातील असून त्यांचा कालखंड मध्यअश्मयुगीन असून आजपासून सुमारे दहा हजार वर्षे ते तीन हजार वर्षे इतका जुना असण्याची शक्यता मानली जाते.

    २०० प्रकार, एक हजारहून अधिक वृक्षांचं संवर्धन; पर्यावरण प्रेमींनी अडीच एकरात उभारलं ऑक्सिजन पार्क

    जतन व्हावे

    कातळशिल्पे ही कोकणातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत, हे आता सर्वमान्य झाले आहे. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग (महाराष्ट्र राज्य), कोकण इतिहास परिषद, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी, देवगड अभ्यास मंडळ देवगड अशा अनेक सरकारी व स्वयंसेवी संस्थांनी तसेच अनेक हौशी भटक्यांनी ही शिल्पे शोधली आहेत. या कातळशिल्पांचे सरकारकडून जतन व्हावे, अशी प्रतिक्रिया अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी दिली. कातळशिल्पे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढणार असल्याने, या शिल्पांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed