• Mon. Mar 16th, 2026

    प्रतिभाकाकींचं कुंकू पुसायला निघालात का? आव्हाडांच्या टीकेला अजितदादांकडून जोरदार प्रत्युत्तर

    प्रतिभाकाकींचं कुंकू पुसायला निघालात का? आव्हाडांच्या टीकेला अजितदादांकडून जोरदार प्रत्युत्तर

    मुंबई : त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल माहिती नाही, अशा टोकदार शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आपण शरद पवार यांच्या निधनाची वाट पाहताय का? असा सवाल करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. अगदी अजित पवार हे प्रतिभा पवार यांचं कुंकू पुसायला निघाले आहेत, असं विधान आव्हाड यांनी केलं. त्यांच्या विधानाला अजित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून उत्तर दिलं.

    अजित पवार काय म्हणाले?

    काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असे स्पष्ट करताना माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत, असा पलटवार अजित पवार यांनी केला.

    त्याचवेळी माझ्या पवारसाहेबांबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही, अशा शब्दात आव्हाड यांच्यावर टीका केली. तसेच सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत असल्याचंही अजित पवार यांनी आवर्जून नमूद केलं.

    बारामतीत बोलताना अजित पवार नेमकं काय म्हणाले, ज्यावरून वाद सुरू आहे?

    लोकसभा निवडणुकीवेळी तुम्हाला भावनिक आवाहन करतील, शेवटची निवडणूक असल्याचं सांगतील, खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल ते माहिती नाही. पण मतदारांनो तुम्ही भावनिक होऊ नका, असे टोकदार विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना केले. बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची शाळा घेतली. यावेळी वरिष्ठांचं आतापर्यंत ऐकलं. आता माझं ऐका, अशी विनंतीही त्यांनी मतदार-कार्यकर्त्यांना केली.

    जितेंद्र आव्हाड अजित पवार यांना काय म्हणाले होते?

    “अजित पवार यांचं हे विधान चीड आणणारं आहे, तितकंच संतापजनक आहे. आपल्या काकाची मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. महाराष्ट्राला पण कळेल की आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघणारा काय माणूस आहे हा… बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील, अशा शब्दात आव्हाडांनी अजित पवार यांचा समाचार घेतला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed