• Sat. Sep 21st, 2024

पित्याला वनवासात पाठवणाऱ्यास, त्यांना दगा देणाऱ्यास राम कसा पावणार? कोल्हेंची सडकून टीका

पित्याला वनवासात पाठवणाऱ्यास, त्यांना दगा देणाऱ्यास राम कसा पावणार? कोल्हेंची सडकून टीका

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मी टीव्हीवर साकारतो. आपल्या मायमाऊल्या लेकरांना माझ्याकडे बोट दाखवून महाराजांसारखं हो, असं सांगत असतात. जर मी त्यांची भूमिका करून भेकडांच्या गर्दीत गेलो असतो, तर मायमाऊल्यांना काय कारण सांगितलं असतं? जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्या भेकडांच्या गर्दीत गेलो नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजितदादांच्या गटात न जाण्यामागची भूमिका स्पष्ट करतानाच त्यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला.

अहमदनगरच्या शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू आहे. शरद पवार यांच्यासहित प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ज्योत निष्ठेची-लोकशाही संरक्षणाची’ या शिबिराअंतर्गत कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संवाद साधत आहेत. यावेळी अमोल कोल्हे यांनी तडफदार भाषण ठोकलं.

कोल्हे म्हणाले, शिबिर हे लढण्याचे शिबिर आहे; ही रुदाली नाही. का झालं, कशामुळे झालं हे सांगण्याचे हे शिबिर नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. ३५० वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही होती. भले भले-मोठे मोठे सरदार, पराक्रमी, वतनदार होते. प्रत्येकाच्या तलवारीला धार होती, मनगटात प्रत्येकाची ताकद होती पण माना मात्र मुघलशाही, आदिलशाही समोर झुकल्या होत्या. कारण प्रत्येकाला आपली वतने वाचवायची होती. पण आत्ता जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्या भेकडांच्या गर्दीत गेलो नाही, याचा मला अभिमान आहे, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्यावर खरमरीत टीका

सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही. लढता लढता मोडून पडेन, पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही, असं सांगतानाच आपल्या पित्याला वनवासात पाठवणाऱ्याला, त्यांना दगा देणाऱ्यास राम कसा पावणार? असा सवाल नाव न घेता अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना विचारला. त्याचवेळी जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी ताठ मानेने लढलात की मान झुकवून शरण गेलात, हे लिहिताना आम्ही निडरपणे लढल्याची नोंद होईल, असंही कोल्हे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्रापुढे एक शब्दही उच्चारण्याची हिम्मत नाही

अमोल कोल्हे म्हणाले, “अफजलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा तुळजापूरच्या मंदिरावर आक्रमण केले तेव्हा अफजलखानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे, मुंबाजी भोसले, बाजी घोरपडे होते. एक एक मातब्बर सरदार होते जेव्हा अफजलखानाने घन उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराचे रक्त सळसळत होतं, प्रत्येकाचे मनगट शिवशिवीत होते, प्रत्येकाचा श्वास फुलला होता, पण बोलायची कुणालाच हिम्मत झाली नाही, कारण पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती”.

“इतिहास कशी पुनरावृत्ती करतो ते बघा. जेव्हा अफजलखानाने घन उचललं तेव्हा पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती म्हणून एकालाही बोलायची हिम्मत झाली नाही इतिहासाची पुनरावृत्ती बघा. वेदांता-फॉक्सकॉन, डायमंड बोस, पाणबुडी, महानंदा हे प्रकल्प गेलेत; कांद्याची निर्यात बंदी झाली. पण, महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही की आमच्या ताटातलं का हिसाकावून घेत आहात ? कारण वतनदारीची झूल जी पांघरली होती ना..! लाचारीने मान जर झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिम्मत उरत नाही”.

अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं

मॅनेजमेंटमध्ये एक तत्व आहे स्वोट अनॅलिसिस जेव्हा आपण आपल्या संघटनेचे स्वोट अनॅलिसिस करतो हे थोडं बौद्धिक आहे, पण हे गरजेचे आहे कारण बौद्धिक शिबिरांचा मक्ता हा फक्त त्यांनीच घेतलाय असे काही गरज नाही. स्वोट एनालिसिस म्हणजे S म्हणजे स्ट्रेंथ आपली ताकद ओळखा, W म्हणजे विकनेस आपली कमकुवत बाजू ओळखा, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, पहिला T म्हणजे थ्रेट आणि शेवटचा T म्हणजे टार्गेट आता यातून आपण आपली स्ट्रेंथ पाहिली तर, देशात ५५ वर्ष मान्य असलेला ब्रँड देशात ५५ वर्ष ज्या माणसाच्या शब्दावर, कर्तृत्वावर प्रत्येकाने पसंतीची मोहोर उमटवली ते आदरणीय पवार साहेब आपल्याबरोबर आहेत ही सगळ्यात मोठी ताकद आहे.

पवार साहेबांच्या कार्य कर्तृत्ववाविषयी अनेकांनी सांगितले आहे. पण, याबरोबरची दुसरी ताकद फार महत्त्वाची ही दुसरी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे ही लढाई आपण जे लढतो आहोत ती लढाई आपण तत्वांसाठी लढतो आहोत ही लढाई आपण लढतो अहो ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ही लढाई आपण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत जेव्हा पाऊल टाकायचे असते तेव्हा पाऊल टाकण्यामागचे कारण माहिती असणे गरजेचे असते आणि तुमच्या प्रत्येकामध्ये ही ताकद आहे की आपण लढाई का लढत आहोत याचे तुमच्या प्रत्येकाकडे कारण आहे. दुसरा येता विकनेस अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतील की आपली यंत्रणा कमी आहे काही कार्यकर्ते सांगतील आपली आर्थिक क्षमता कमी आहे पण स्वोट एनालिसिस मध्ये विकनेसला आपली स्ट्रेंथ बनवायचे असते तुमची आर्थिक क्षमता कमी आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर स्वतःला तसे सांगा आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीला घाबरायची गरज नाही.

तिसरी गोष्ट अपॉर्च्युनिटी मागच्या रांगेत बसलेले अनेक जण पुढच्या रांगेत आले पालखी वाहणाऱ्यांना पालखीत बसण्याची संधी चालून आलेली आहे आणि ती संधी आता आम्ही सोडणार नाही त्यामुळेपालखी वाहणाऱ्यांना पालखीत बसण्याची जी संधी येते त्यात वर्षानुवर्ष जातात टाचा घासल्या जातात चपला घासल्या जातात पण ही संधी मिळत नाही. आता या संधीचे सोने करणे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे नंतर येतं ते थेट धोका काय ? पराभव तर आपला होत नसतो कुणी काय बी बोलू द्या मार्जिन थोडेफार कमी होईल. व्यक्तिगत नाही पक्षाचं बोलतोय व्यक्तिगत नंतर येतो, मार्जिन थोडेफार कमी होईल अशी ज्याच्या मनात भीती येईल त्याने स्वतःच्या मनाला सांगावं पिंजऱ्यातल्या पोपटाकडे जाऊन जर बघितलं तर पिंजरा जरी सोन्याचा असला ना तरी सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटापेक्षा झाडाच्या फांदीवर जाणारा पोपट जास्त महत्त्वाचा ठरतो. आणि शेवटी राहतं ते टार्गेट आणि हा टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय नाही हे व्यक्तिगत कार्यकर्त्याचे नाही हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे ती महाराष्ट्राची अस्मिता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed