• Sat. Sep 21st, 2024
‘लक्षवेधी’सोडून काँग्रेस आमदार सभेच्या बैठकीकरिता गेले, सत्ताधाऱ्यांकडून तीव्र आक्षेप

नागपूर : विविध प्रश्नांवर लक्षवेधी लावून आमदार सभागृहात अनुपस्थित राहत असल्याची नाराजी विधानसभेचे सभापती आणि मंत्र्यांनी व्यक्त केली. काँग्रेससह विविध पक्षांचे आमदार त्यांच्या लक्षवेधींच्या वेळी अनुपस्थित राहल्याने अनेक लक्षवेधी सूचना कोणतीही चर्चा न होत्या पुढे ढकलण्यात आल्या.

मंगळवारच्या कामकाजामध्ये अनेक आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, तालिका सभापती समीर कुणावार यांनी लक्षवेधी पुकारल्यानंतर हे आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती मात्र ती पुकारल्यानंतर पटोले उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल बोलायला उभे राहिल्यावर आमदार बच्चू कडू यांनी त्यावर आक्षेप घेतला. “पटोले विदर्भातील असून त्यांना मुंबईच्या प्रदूषणाचा प्रश्न मांडावासा वाटतो. लक्षवेधीच्या वेळी त्यांच्यासह इतर आमदार अनुपस्थित राहतात. अनुपस्थित राहिल्याबद्दल पटोले यांच्यावर कारवाई केली जावी,” अशी मागणी कडू यांनी केली.

आधी धुसफुसले, नंतर हसले; नाराजीनाट्यानंतर विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन
उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून लक्षवेधीसाठी विशेष सत्र घेतले जाते. या प्रश्नांना उत्तरे देता यावी म्हणून मंत्री माहिती घेऊन येतात. मात्र, समस्या मांडणारे आमदारच अनुपस्थितीत राहतात. अशा आमदारांच्या लक्षवेधी रद्द करण्यात याव्या,” असे सामंत म्हणाले. यावेळी तालिका सभापतींनीही नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अन्य काँग्रेस नेते हे नागपुरात २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या काँग्रेसच्या सभेसंदर्भातील बैठकीकरिता गेले असल्याने सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहितीन अमीन पटेल यांनी सभागृहाला दिली.

‘एसआरए’ इमारतींचे दोनदा ऑडिट होणार,आगीच्या घटना रोखण्यासाठी निर्णय,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा
‘सेटिंग’वरुन पटोले नाराज

पटोले यांनी मुंबईच्या प्रदूषणावर लक्षवेधी उपस्थित केली होती. बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना अशा प्रकारच्या लक्षवेधी या ‘सेटिंग’साठी आणल्या जातात अशी टीका केली. सभागृहात परत आल्यानंतर पटोले यांनी या शब्दावर तीव्र आक्षेप घेतला. ‘ असे शब्द वापरून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. खरे ‘सेटिंगबाज’ कोण आहेत, हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा शब्दप्रयोग पटलावरुन वगळण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

एक रुपयांत घ्या प्लान्ट विकत, रतन इंडियाची राज्य शासनाला अनोखी ऑफर

भास्कर जा‌धवांचाही ‘लक्षवेध’

विधानसभेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या लक्षवेधी सूचनांचा विचार केला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सलग दोन अधिवेशनांमध्ये आपल्याला लक्षवेधी सूचना मांडण्याची संधी मिळालेली नाही. या सदनाचा ज्येष्ठ सदस्य असतानाही मला लक्षवेधी मांडू दिली जात नाही. हा जसा माझ्यावर अन्याय आहे तसाच ज्या लोकांशी संबंधित हा प्रश्न आहे, त्यांच्यावरही हा अन्याय असल्याची खंतही जाधव यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed