• Fri. Mar 13th, 2026
    आनंदाची बातमी! ‘समृद्धी’वरील रस्ता सुरु होण्याआधीच सुविधांची तयारी, इगतपुरी-घोटी मार्गासाठी निर्णय

    मुंबई : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता इगतपुरी ते घोटीदरम्यानचा रस्ता तयार होण्याआधीच सुविधांच्या उभारणीची तयारी केली जात आहे. याअंतर्गत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या या रस्त्यालगतच्या सुविधांसाठी निविदा काढण्यात आली आहे. या रस्त्यावर झालेल्या प्राणांतिक अपघातांना सुविधांअभावी होणारे रस्ते संमोहन कारणीभूत असल्याची टीका वारंवार झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता महामार्गाचा पुढील टप्पा सुरू होण्याआधीच त्यावरील रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे.

    समृद्धी महामार्गाचे डिसेंबर २०२२मध्ये उद्घाटन झाले. त्या वेळी हा महामार्ग नागपूर ते शिर्डी असा ५१८ किमी सुरू झाला. पुढील टप्प्यात ८२ किमीचा मार्ग मे महिन्यात सुरू झाला. त्यानुसार सध्या नागपूर ते भरवीर खुर्द (सिन्नरजवळ) दरम्यान हा मार्ग सुरू झाला आहे. आतापर्यंत सुरू झालेल्या या संपूर्ण ६०० किमी मार्गावर रस्त्यालगतच्या सुविधा, हा महामार्ग सुरू झाला त्या वेळी नव्हत्या. त्या टप्प्याटप्प्याने नंतर सुरू करण्यात आल्या असून, त्यांचा आकडा दोन्ही बाजूला मिळून जेमतेम १५ इतका आहे.

    समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभा केला आहे. आधीच्या स्थितीवरून धडा घेऊन महामंडळाने आता नाशिक जिल्ह्यात मुंबई ते नागपूर मार्गावर १० ते १२ हेक्टर व नागपूर ते मुंबई दिशेनेदेखील १० ते १२ हेक्टर मोकळ्या जमिनीच्या विकासासाठी निविदा काढली आहे. याअंतर्गत संबंधित जमीन मालकाने स्वत: तिथे सुविधा उभ्या कराव्यात किंवा सुविधा उभारणीसाठी ती जमीन महामंडळामार्फत कंपनीला द्यावी, असे निविदेत नमूद आहे. यावरील बांधकामासाठीचा कालावधी ४२ ते ६० महिने असेल. चार जानेवारी ही निविदेची अखेरची तारीख आहे. ‘महामार्गाच्या इगतपुरी ते घोटीदरम्यानच्या भागासाठी अशा सुविधांची उभारणी होत आहे,’ असे ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.
    मिठागरांवर धावणार रेल्वे टर्मिनस; MRVCकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरु, असा आहे प्रकल्प…
    बांधकामाच्या अंतिम टप्प्यातील पॅकेज

    समृद्धी महामार्ग एकूण १६ पॅकेजमध्ये बांधला जात आहे. त्यापैकी १२ पॅकेजमध्ये (नागपूर-भरवीर खुर्द, जि. नाशिक) हा महामार्ग सुरू झाला आहे. तर, इगतपुरीजवळील थळघाटाच्या डोंगरातील महत्त्वाचा १३.१ किमी लांबीचा पॅकेज क्रमांक १४मधील रस्ता बांधून तयार आहे. त्याआधी पॅकेज १३चे काम काही प्रमाणात बाकी असल्याने महामार्गाचा हा भाग अद्याप सुरू झालेला नाही. रस्त्यालगतच्या सुविधांसाठी काढलेली निविदा ही या पॅकेज १३ व १४ दरम्यानच्या भागातीलच आहे, हे विशेष.

    मृतांच्या कुटुंबीयांचा मूक मोर्चा

    वर्धा : बुलढाणा ट्रॅव्हल्स अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी सोमवारी वर्ध्यात मूक मोर्चा काढला. काळ्या फिती लावत कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे. बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघाताला पाच महिने लोटले असतानाही मृतकांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. अपघाताची चौकशी करावी व मृतांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी यातून करण्यात आली. २५ प्रवाशांचा या अपघातात होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एक जुलै रोजी घडली होती. या घटनेनंतर सरकारकडून मदतीचे आश्वासन देण्यात आले; पण आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने कुटुंबीयांनी वर्ध्यात मूक मोर्चा काढून याकडे लक्ष वेधले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed