• Fri. Mar 13th, 2026

    आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

    आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

    म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : बेमोसमी पाऊस आला आणि होते नव्हते ते घेऊन गेला. अशा परिस्थितीत निसर्गाने गांजलेला शेतकरी हताश झाला आहे. लोक्रपतिनिधी आणि पुढारी आवणांमध्ये उतरून भिजलेल्या भाताच्या पेंढ्या दाखवून फोटोसेशन करीत आहेत, तर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी निवेदन देत पंचनामे करण्याची मागणी करीत आहेत. यामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला खरोखरच मदत होणार का, असा सवाल सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करीत आहेत.

    भातशेतीला एकरी किमान २५ हजार रुपये खर्च येतो. बियाणे खरेदीपासून त्याची लूट होत आहे. त्यात मनासारखे पीक आले तर बाजारभाव मिळेल, याची शक्यता नाही. शासनाने आधारभूत किंमत जाहीर करताना केलेली कंजुषी मारक ठरत आहे. यावर्षी तर हंगामाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिली आणि शेवटी पाठ फिरवली. त्यामुळे अगोदरच उत्पन्नात घट येणार, हे निश्चित झाले होते. तशात कापणी करण्याच्या वेळी झालेल्या बेमोसमी पावसाने भिजवलेला भात आता पशुखाद्य म्हणूनही उपयोगाचा राहिलेला नाही. बाजारात व्यापारी विचारणार नाही आणि शासनाने त्याचा अद्याप विचार केलेला नाही. त्र्यंबक तालुक्यात भात लागवडीखालील क्षेत्र १५ हजार ७७७ हेक्टर इतके आहे. त्यापैकी विमा संरक्षित क्षेत्र ९ हजार ६३८ हेक्टर झाले आहे. एकूण १० हजार ५४६ भात उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या एक रूपया विमा संरक्षणाचा लाभ घेतला आहे.

    विमा कंपनीचा नंबर नॉट रिचेबल

    यावर्षी शासनाने एक रुपयात पीकविमा देत बळीराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच कोट्यवधी रुपये प्रीमिअम विमा कंपनीला भरलेला आहे. काढणी प्रक्रियेत पिकांचे नुकसान झालेले आहे. आता विमा कंपनीने भरपाई देणे क्रमप्राप्त आहे. शासनाने विम्याचा हप्ता भरलेला आहे. त्यापोटी मिळणारी भरपाई शेतकऱ्याला मिळवून दिल्यास ती खऱ्या अर्थाने मदत ठरणार आहे. आजच्या घडीला विमा कंपनीचा टोल फ्री नंबर लागत नाही. नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला कळवायचे आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
    आता डोळ्यांत पाऊस! नाशिक जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील पिके आडवी, द्राक्षाला सर्वाधिक फटका
    भात शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. केवळ हजार दोन हजार रुपयांची मदत देऊन भागणार नाही. भिजलेला भात शासनाने प्रतवारीचा विचार न करता हमी भावाने खरेदी करावा. विमा भरलेला असेल त्यांना विम्याचा परतावा देण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांनी कागदपत्रांची मदत करावी.- संपतराव सकाळे, संचालक, बाजार समिती

    शेतकऱ्यांच्या अपेक्षा

    – भिजलेला भात हमी भावाने खरेदी करावा
    – एकरी अनुदान देऊन रोख आर्थिक मदतीची गरज
    – रब्बी पिकासाठी बियाणे आणि आर्थिक मदत करावी
    – पुढच्या खरीप हंगामात भात बियाणे उपलब्ध करावे
    – पशुपालक शेतकऱ्यास मका बियाणे वाटप करावे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed