अवकाळी पाऊस, गारपिठीने झालेल्या शेतीपिकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विविध जिल्ह्यात पाहणी केली. यानंतर विरोधी पक्षनेते दानवे यांनी विभागीय आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
दानवे म्हणाले, अवकाळी पावसाने राज्यातील १६ जिल्ह्यात शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. त्यात मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विभागात ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकार बाहेरच्या राज्यातील निवडणुकांच्या प्रचारात जुंपलेले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.
राज्यसरकार केंद्राची मदत घेऊ असे सांगते आहे, याचा अर्थ राज्य सक्षम नाही. सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु त्याचा निधी दिला नाही. त्यापूर्वी अवकाळी, सततचा पाऊस, मागच्या अतिवृष्टीचे पैसेही सरकारने दिलेले नाहीत. केवळ नुकसान भरपाईच्या घोषणा सरकार करते आहे. येत्या अधिवेशनात यावर आवाज उठविण्यात येईल. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. पण या विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला फाट्यावर मारत न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, लक्ष्मण वडले, वसीम देशमुख, नंदकुमार घोडेले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू अशी घोषणा कृषिमंत्र्यांनी केली होती. परंतू शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली नाही. अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. राज्य सरकारने ४० तालुके दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यातील दुष्काळग्रस्तांसाठी सुध्दा केंद्राकडे मदत मागावी लागणार असल्याचे सरकार सांगत आहे. दुष्काळ संपुर्ण मराठवाड्यात जाहीर व्हावा, अशी आमची मागणी आहे. आणि आताच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.