• Sun. Mar 8th, 2026
    आठवड्याच्या अखेरीस मुंबईत पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अंशतः ढगाळलेले वातावरण असून आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे, पालघर परिसरात एखाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मात्र गुरुवारपासून पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी याची व्यापकता अधिक असेल, असाही अंदाज आहे.

    गुरुवारी कार्तिकी एकादशी झाल्यानंतर शुक्रवारपासून राज्यभरात ठिकठिकाणी तुळशी विवाहाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली येथे गुरुवारपासूनच मेघगर्जनेसह एक-दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर शुक्रवारपासून रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशीव येथेही पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित विभागांमध्ये शनिवार, रविवारी पाऊस पडू शकेल. शनिवार आणि रविवारी यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांचाही समावेश होऊ शकतो. परभणी, हिंगोली, नांदेड येथे हलक्या सरींची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांना मात्र यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

    डिलाइल उड्डाणपूल आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार, आदित्य ठाकरे यांनाही आमंत्रण
    तमिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळ बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राच्या पसरलेल्या आसामुळे १५ अंश अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या व तमिळनाडू व केरळ राज्यांवरून पश्चिमकडे वाहणाऱ्या तीव्र पूर्वी वाऱ्याच्या झोतातून वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यांमुळे आणि चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे तमिळनाडू व केरळ राज्यांत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. ही प्रणाली भूभाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करून गुजरात राज्य व्यापून उत्तर महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरदरम्यान डांगी परिसरातून उतरणार आहे. त्यामुळे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

    दोन प्रणालींचा एकत्रित परिणाम

    शनिवार २५ नोव्हेंबरला वायव्य, तसेच उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत होणार असल्यामुळे या दोन्हीही प्रणलींचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर २३ ते २७ नोव्हेंबरच्या पाच दिवसांच्या पावसाळी वातावरणावर होणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या एक-दोन दिवसांत चक्रीय वाऱ्याची स्थिती व कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बिजे रोवण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळ विकसित होऊन बांगलादेशाकडे त्याची वाटचाल असू शकते, असेही ते म्हणाले. याचा महाराष्ट्रावर परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र शनिवार ते सोमवार या तीन दिवसांमध्ये राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी पडू शकतो. २६ नोव्हेंबर रोजी पावसाचे वातावरण तीव्र होण्याचा अंदाज आहे.

    मांडी थोपटाल, तर दंड थोपटू! मनोज जरांगेंची इगतपुरीत तोफ धडाडली, भुजबळांचा परखड भाषेत समाचार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed