पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
डी.सी.पी. सोहेल शर्मा यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मुंबई बंगळुरु हा महामार्ग देशातील महत्त्वाचा मार्ग आहे. पहिल्या अर्धातासात साताऱ्याकडील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व्हिस रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती सोहेल शर्मा यांनी दिली आहे. पुरेसं पोलीस दल घटनास्थळी असून आंदोलकांशी चर्चा करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे, असं सोहेल शर्मा म्हणाले.
तब्बल अडीच तासानंतर नवले ब्रिजावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांच्यावतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. टायर जाळून जाळपोळ केल्याने तब्बल सहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा,असं मराठा आंदोलकांनी म्हटलं. नवले पुलाच्या परिसारातील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान दोन तास लागतील, अशी माहिती आहे.
राज्यात एवढं सगळं घडत असताना गृहमंत्री कुठं आहेत. जालना प्रकरण, ड्रग्ज प्रकरण, बीडचं प्रकरण झालं आणि आज नवले पुलावरील घटना हे सगळं घडत असताना गृहमंत्री कुठं आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री असताना दिलं होतं. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News