• Sat. Sep 21st, 2024
नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलेला निळवंडे प्रकल्प काय? आणि शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे?

अहमदनगर: निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून डाव्या कालव्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी दुपारी झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुजय विखे आदी नेते उपस्थित होते.

निळवंडे प्रकल्प एवढा महत्त्वाचा का आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

PM मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखेंची तयारी; शिर्डीत लाखाची गर्दी जमवणार, असे आहे नियोजन
५१७७ कोटी रुपये खर्चून निळवंडेची निर्मिती

पंतप्रधान मोदी यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे ८५ किमीचं जाळं राष्ट्राला समर्पित केलं. यामुळे जलवाहिन्यांद्वारे थेट पाईप मधून जल वितरण सुविधा उपलब्ध झाल्याने 7 तालुक्यांतील (अहमदनगर जिल्ह्यातील ६ आणि नाशिक जिल्ह्यातील १) १८२ गावांना याचा लाभ होईल. निळवंडे धरणाची संकल्पना सर्वप्रथम १९७० मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे ५१७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित करण्यात आले आहे.

अहमदनगरच्या म्हालादेवी गावात हा प्रकल्प १९७० मध्ये मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी ७.९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. तर धरणाची धारण क्षमता ११ टीएमसी निश्चित करण्यात आली होती. प्रकल्पाशी संबंधित सर्व काही निश्चित झाले होते, परंतु ९ वर्षे फाईल बंदच राहिली. १९९५ मध्ये हा प्रकल्प म्हाळादेवी गावातून निळवंडे येथे स्थलांतरित करण्यात आला. धरणाची धारण क्षमता ११ टीएमसीवरून ८.५२ टीएमसीपर्यंत कमी केली, पण बजेट वाढले.

मेडीगड्डा धरणावरील पुलाचे खांब खचले; अचानक पाण्याचा विसर्ग, २० गावातील शेतकऱ्यांना फटका
विलंब होत राहिला, बजेट वाढतच गेले

निळवंडे धरण प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही. प्रकल्पाला विलंब होत राहिला, ज्यामुळे प्रकल्पाचे बजेट सातत्याने वाढत गेले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणी कोपरगावसह नाशिक जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरणाचे बांधकाम २०१४ साली पूर्ण झाले. मात्र कालव्याचे रखडले होते. यासह प्रकल्पाचा खर्च ५१७७ कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच जे काम ७.९ कोटी रुपयांत होणार होते, त्यात विलंबामुळे ५१६९ कोटी रुपयांची भर पडली, ज्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च ५१७७ कोटी रुपयांवर पोहोचला. हा संपूर्ण प्रकल्प धरण आणि कालव्याच्या जाळ्यासह १८२ किमी भागात पसरलेला आहे.

१२५ गावांचा प्रश्न सुटणार

दरम्यान, धरण बांधणीसाठी ५३ वर्षाचा कालावधी लागला असला तरी आता या धरणामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटेल. ६८००० हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न संपणार आहे. हा बंधारा सुरू झाल्याने नाशिक ते अहमदनगर दरम्यानच्या १२५ गावांना पिण्याचे पाणी मिळेल. निळवंडे धरणातून लहान वितरणांसाठी पाईपचे जाळे तयार केले जात आहे मात्र, ते वापरात येण्यासाठी आणखी तीन वर्षाचा कालावधी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed