जरांगे पाटील यांची सोमवारी दुपारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष होते. जरांगे यांना ऐकण्यासाठी १५ ते २० हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. सकाळी ९ वाजेची वेळ होती, मात्र दुपारी एक वाजता जरांगे यांचे सभास्थळी आगमन झाले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मराठा समाजाने तुमच्यावर उपकार केले आहेत. ते उपकार फेडण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे. आम्ही तुम्हाला आपले मानले, पण तुम्ही आम्हाला आपले मानायला तयार नाहीत. गेल्या ७० वर्षांत भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले आहे. त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही. याची जाणीव ठेवून आमच्या आरक्षणाला होणारा विरोध करू नका. राज्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारही त्यांनी यावेळी सरकारला दिला.
मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही. गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण द्या, असे आवाहन त्यांनी केले. मराठा आणि कुणबी एकच आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याच्या नोंदी सर्वत्र आहेत. मराठवाड्यात उर्दू, फारसी, मोडी अशा विविध भाषांतील कागदपत्रांत या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेल्या आहेत. त्यामुळे उपोषणाबाबत चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसांचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो. यावेळी सातत्याने टिकणारे आरक्षण हवे तर एक महिन्याचा कालावधी द्या, असे राज्य शासन वारंवार सांगत होते. खरेतर मंत्रिमंडळ एक ठराव करूनही आरक्षण देऊ शकत होते. मात्र, त्यांनी दिलेले आरक्षण टिकले नाही तर ते पुन्हा महिन्याचा कालावधी दिला नाही असे म्हटले असते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याच्या कालावधी देण्याचा ठराव करावा, अशी विनंती केल्यावर आम्ही तीस, नव्हे तर चाळीस दिवसांचा कालावधी दिला आहे. मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी सकल मराठा समाजासह आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे संभाजी पवार, रतन बोरनारे, विठ्ठल शेलार, संजय बनकर, अमृता पवार, छगन आहेर आदींसह सकल मराठा समाज उपस्थित होता. सूत्रसंचालन सुनील गायकवाड, प्रमोद पाटील, पांडुरंग शेळके यांनी केले. आभार अरुण काळे यांनी मानले. येथे सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनालाही जरांगे यांनी भेट दिली.
‘जेसीबी’तून पडून चार जखमी
जरांगे यांच्यावर तब्बल २० जेसीबींमधून पुष्पवर्षाव करीत स्वागत करण्यात आले. मात्र, यादरम्यान जेसीबीमधून पडून चार जण जखमी झाले. जेसीबीच्या पंजात उभे राहून कार्यकर्ते पुष्पवर्षाव करीत असताना अज्ञात व्यक्तीचा जेसीबीच्या गीअरला धक्का लागला. त्यामुळे सोंडेचा भाग अचानक खाली झुकल्याने चार कार्यकर्ते जमिनीवर कोसळले. जखमी झालेल्या चौघांपैकी एकजण गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. गंभीर जखमीला नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News