गांधी भवन येथे शनिवारी (२३ सप्टेंबर) आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांच्यासह मुस्लिम रिझर्व्हेशन फ्रंटचे अजमल खान, सुभाष लोमटे, अन्वर राजन, अब्दुल शकुर सालार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. मराठा समाजाला १६ आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात करण्यात आली. कोर्टात आरक्षण प्रकरण गेले होते. कोर्टाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे याबाबत अनुकूलता दर्शविली. अजूनही आरक्षण मिळालेले नाही. आरक्षणासाठी राज्यभरात विचार तयार व्हावा. सत्याग्रह किंवा चळवळ उभारून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद असावी. यासाठी राज्यभरात मुस्लिम परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले राजे’:
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर तसेच सांगली येथे अल्पसंख्याकावर हल्ला झाल्याचे प्रकरणे समोर आली आहे. यात पोलिसांच्या भूमिकेवर माजी खासदार दलवाई यांनी प्रश्न चिन्ह उभे केले आहे. मुस्लिम समाजातील युवकांना संदेश देताना ते म्हणाले, ‘आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. याची जाणिव ठेवावी.’
लोकसंख्येनुसार आरक्षण द्या:
मुस्लिम रिजर्व्हेशन फ्रंटचे अजमल खान यांनी ‘मौलाना आझाद विचार मंचाच्या आरक्षणाच्या कामासोबत आपण असल्याची घोषणा केली. आता मुस्लिम समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण मिळावे,’ अशीही मागणी केली.
मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री तयार आहेत का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण देण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. याबाबत दलवाई म्हणाले, ‘यापूर्वी महाविकास आघाडीतही अजित पवार उपमुख्यमंत्री होते. आता भाजप आणि शिंदे यांच्यासह सत्तेत आहेत. त्यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत करून मुख्यमंत्री आणि भाजपचे उपमुख्यमंत्री तयार आहेत का?’ ‘अजित पवार यांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत. अमित शहा यांच्याकडून मुस्लिम आरक्षणाचा निर्णयाबाबत संमती आणावी,’ अशीही सूचना त्यांनी केली.