• Fri. Mar 13th, 2026
    LPG Shortage: सिलिंडरची अंत्ययात्रा, चुलीवर भाकरी! गॅस दरवाढीसह टंचाईवरुन सरकारविरुद्ध काँग्रेसचे विदर्भात आंदोलन

    Congress Protest Over LPG Fuel Shortage: चिखली तहसील कार्यालयासमोर सिलिंडरची अंत्ययात्रा काढत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

    Congress Protest Over LPG Fuel Shortage(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    बुलढाणा: आखाती देशातील युद्धाचे परिणाम महाराष्ट्रातील जनतेलाही भोगावे लागत आहेत. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता असतानाच गॅस सिलिंडरची केंद्र सरकारने दरवाढ केल्याने काँग्रेसने गुरुवारी विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत आंदोलन केले. या आंदोलनांत पक्षातर्फे सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

    केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याने जनतेत रोष निर्माण झाला आहे. केंद्रात सत्तेत आल्यापासून सरकारने आजवर किमान ५०वेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. काँग्रेसच्या काळात ४०० रुपयांवर असलेला गॅस सिलिंडर आता ९०० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरही गेल्या आठवडाभरात १५० रुपयांनी महाग झाल्याने त्याची किंमतही १ हजार ९००च्या जवळपास पोहोचली आहे.

    Maharashtra TimesSatara News : महाराष्ट्रावर शोककळा, साताऱ्याचे जवान बाळकृष्ण निकम यांना भारत-चीन सीमेवर वीरमरण, देशसेवा करताना शहीद
    एकीकडे महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणायचे आणि दुसरीकडे महिलादिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट देण्याचा सरकारचा दुपट्टीपणा समोर आला आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडले असून लाडक्या बहिणींवर चूल पेटवण्याची वेळ आली आहे. हेच का केंद्र सरकारचे अच्छे दिन, असा संतप्त सवाल या आंदोलनादरम्यान काँग्रेसतर्फे करण्यात आला.

    Maharashtra TimesAccident News : पुण्यात जॉब, डोळ्यांत स्वप्नं, थायलंडच्या सहलीतच नको ते घडलं; बीडच्या पूजाचा फुकेतमध्ये दुर्दैवी अंत
    चिखली तहसीलदारांना घेराव
    बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली येथे तहसील कार्यालय परिसरात गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी थापून सिलिंडर दरवाढीचा तसेच सिलिंडर मिळत नसल्याचा निषेध नोंदवला. जिल्ह्यात तालुकास्तरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. चिखली येथील आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी, अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले आहे. त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही. यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत, हेच स्पष्ट झाल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी चिखलीचे तहसीलदार कार्यालयाबाहेर न आल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना घेराव घातला. या आंदोलनात रामभाऊ जाधव, अतहरोद्दीन काझी, अंबादास वाघमारे, शहराध्यक्ष जाकीर शेख, संगीता गाडेकर, विद्या देशमाने, खलील बागवान, अशोक पडघान, पांडुरंग भुतेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा