अंतरवाली सराटी येथे शनिवारी जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार व शक्ती नाही की त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालणार नाही. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने वाढविली आहे. आता कोण नागपूरला जातेय,कोणी कोल्हापूरला जातेय,कोणी पुण्याला जाऊन उचूकन देतेय. कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर येणार नाहीत. दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल,असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. राज्यातील समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं,त्यांना पुरावे कुठं मागतायत.आमच्याकडे गाड्याच्या गाडे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण नाही. दोन दिवसात गुन्हे परत घेतो असे सांगितले होते.परंतु,अद्याप गुन्हे परत घेतलेले नाहीत. यामुळे आता आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे.यासाठी राज्यव्यापी मेळावा घेतला जाणार असून,मेळाव्याला ३५ लाखावर मराठा समाज बांधव येणार आहेत. मेळाव्यासाठी १० ते १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी शनिवारी रेणापुरी गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.
१४ तारखेला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा कार्यक्रम
राज्य सरकारला जागं करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मुख्यमंत्र्यांच्या हाताने फळांचा रस घेऊन उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे.या दिवसात मराठा समाजाला आरक्षण आणि सरसकट कुणबी प्रमाण देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारनं एक समितीही स्थापन केली आहे.त्यासाठी सरकारला पुन्हा जागं करण्यासाठी येत्या १४ तारखेला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला मनोज जरांगे संबोधित करणार असून त्यावेळी सरकारला जाब विचारणार आहेत.