• Sat. Sep 21st, 2024
एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर

सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव काळात गणेशाची प्रतिष्ठापना अंगापूर तर्फ गावात सार्वजनिक ठिकाणी केली जात नाही. या गावात गणेशाची स्वयंभू मूर्ती असून भद्रोत्सव म्हणजे या गावाची एकच जत्राचा असून पंचक्रोशीतील सर्व लोक यात सहभागी होतात.

अंगापूर तर्फ गावातील या गणेशाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. ३५० वर्षांपूर्वी अंगापूर तर्फ गावातील सुवर्णकार समाजातील गणेश भक्त दर्शनास संकष्टी चतुर्थीला मोरगावला पायी जात असत. बरीच वर्ष त्याचा हा नित्यक्रम सुरू होता. सुवर्णकार वृद्ध झाल्यानंतर त्यांनी विचार केला, की आता आपणास एवढे चालणे होणार नाही, म्हणून एका चतुर्थीस गेल्यावर त्याने गणेशाला आपले मनोगत सांगितले, की “हे मयुरेश्वरा आजपर्यंत मी तुझी सेवा केली परंतु वृद्ध झाल्याने आता यापुढे ती सेवा शक्य होणार नाही. त्यावेळी मयुरेश्वर त्याला दृष्टांत दिला की “मी तुझ्याबरोबर येत आहे, पण तू मागे वळून पाहू नको. नाहीतर मी तेथेच थांबेल.

श्री गणेशभक्त अंगापूरला परत येण्यास निघाला. तो अंगापूरजवळ आला व तेथे त्यांनी मागे वळून पाहिली तेथेच श्री गणेश अदृश्य झाले. सुवर्णकाराने ही घटना गावकऱ्यांना सांगितली. ज्या ठिकाणी श्री गणेश अदृश्य झाले, त्या ठिकाणी गावकऱ्यांनी उकरून पाहिले असता श्री गणेशाची मूर्ती सापडली, त्याच ठिकाणी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. अशी आख्यायिका सांगितली जाते.

अंगापूरचे गावकरी व फत्यापूर येथील श्री गणेश भक्त कुलकर्णी यांनी दगडी बांधकामाचे भव्य असे पुरातन मंदिर उभारले आहे. मंदिरात श्री गणेश व श्री शंकराची पिंड आहे. समोर सभामंडप आहे. सन १९१८ मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये या मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. यामध्ये पिंड भंग पावली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी रुद्राभिषेक, धार्मिक विधी करून पिंडीची पुनर्स्थापना केली.

साताऱ्यातील सुखेड आणि बोरी गावातील महिलांची शिव्या देण्याची अनोखी प्रथा

स्वयंभू गणेशमूर्तीची पूजाअर्चा १२ महिने सुरू असते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया ” या दिवशी संध्याकाळी अंगापूरमधील ३५० ते ४०० तरुण मुले कृष्णेचे स्नान करून पाणी घेऊन अनवाणी पायाने श्री गणेशा स्नान घालतात. यासाठी अंदाजे ५० ते ५५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या प्रवासास “दोरा” असे म्हणतात. उत्सवास मुख्य दिवस पंचमी या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते. सायंकाळी भगत पात्रात (मातीचा अर्ध्या आकाराचा डेरा), उद, धूप, कापूर, खारीक टाकून कापसे यांच्या हस्ते प्रज्वलित केला जातो. सुवर्णकार भक्ताच्या डोक्यावर भगतपात्र दिले जाते. अंगापूर तर्फ तारगाव येथील ग्रामस्थ गणेश मूर्तीची पालखीत स्थापना करून पात्र घेऊन अंगापूर वंदन येथे जातात. त्यानंतर अंगापूर तर्फ पालखीसह अंगापूर वंदन येथील श्री गणेशाची पालखी आणि भक्तांसह भगतपात्रासह अंगापूर तर्फ तारगाव येथे गणेश मंदिरात जाते. आरतीनंतर गणेश मंदिरात पाच प्रदक्षिणा घालून पालखी कुलस्वामिनी ज्योतिर्लिंग देवाच्या मंदिरात जाते.

तेथे दर्शन घेऊन व प्रदक्षिणा घालून अंगापूरतर्फे येते. या ठिकाणी भक्तास ग्रामस्थ अंगापूरतर्फे संपूर्ण पोशाख भेट स्वरूपात देण्यात येतो. फक्त त्याचा स्वीकार करून त्याच्या ओटीतील प्रसाद ग्रामस्थांना देतात. त्यानंतर दोन्ही पालख्या भक्तांस अंगापूर वंदन येथील मारुतीचे दर्शन घेऊन अंगापूर गावात येतात. त्यानंतर अंगापूर वंदन येथील गणेश मंदिरात प्रदक्षिणा घालून भगत पात्राचे विसर्जन होते. विसर्जननंतर मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात. त्याचवेळी अंगापूर वंदन येथील प्रमुख ग्रामस्थ अंगापूर तर्फ येथील ग्रामस्थांचा मानाचा प्रसाद पानविडा व श्रीफळ देतात, त्यानंतर उत्सवाची सांगता होते.

‘एक गाव, एक गणपती, एक गणेशोत्सव’, महाराष्ट्रातील ‘या’ गावात अनोखी परंपरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed