• Sat. Mar 14th, 2026

    शिंदे-ठाकरे गटाच्या राजकारणाने टोक गाठलं; वादामुळे गणपती बाप्पालाच तब्बल ३ तास रस्त्यावर थांबावं लागलं!

    शिंदे-ठाकरे गटाच्या राजकारणाने टोक गाठलं; वादामुळे गणपती बाप्पालाच तब्बल ३ तास रस्त्यावर थांबावं लागलं!

    कोल्हापूर : गणेशोत्सवादरम्यान कोल्हापुरात आज दोन गटांच्या वादात तब्बल २ ते ३ तास गणपती बाप्पालाच रस्त्यावर थांबायची वेळ आली. कोल्हापुरातील संयुक्त शिवाजी चौक तरुण मंडळावर शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा सांगत मंडळामध्ये गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आज दुपारी शिवाजी चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी पोलिसांची दमछाक झाली.

    सण उत्सवाचे दिवस असताना बिंदू चौकात तब्बल १०० ते १५० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याआधी दोन्ही गटाच्या नेत्यांसोबत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक पार पडली. मात्र यात देखील कोणताही तोडगा न निघाल्याने बिंदू चौक ते छ. शिवाजी महाराज चौक हा रस्ता बंद करण्यात आला. ठाकरे गटाने बिंदू चौकात पालखीतून गणपती शिवाजी चौकाकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांकडून तिथेच थांबवण्यात आलं. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पाच्या मूर्तीसह रस्त्यावरच ठिय्या मांडला. दरम्यान एका नारद मुणीच्या सांगण्यावरून पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केला.

    १६ आमदारांच्या अपात्रतेबाबातच्या निकालापूर्वी राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, हालचालींना वेग, सोक्षमोक्ष लागणार

    हा प्रकार सुरू असतानाच दुसरीकडे छ. शिवाजी महाराज चौकात देखील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दाखल होत या आधीच रात्रीत बसवलेल्या 21 फुटी गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देखील कायदेशीरदृष्ट्या आणि सर्व परवानगी घेऊनच आपण इथे गणपती बसवला असल्याचा दावा केला. उलट ठाकरे गटाची काही बोलबच्चन आणि आंदोलन करून पाकीट गोळा करणारी लोकं लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी क्षीरसागर यांनी संजय पवार, विजय देवणे आणि रवी इंगवले यांच्यावर केला आहे.

    दरम्यान पोलिसांनी दोन्हीही नेत्यांशी चर्चा करून मधला मार्ग काढत ठाकरे गटाचे गणेशमूर्ती त्याच चौकात दुसऱ्या ठिकाणी बसवण्याचा मार्ग काढला. त्यास काही आमची हरकत नसल्याचं क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत, आता त्यांनी ही एक पाऊल मागे जावं, असं आवाहन करतानाच या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असून कोणी आमच्या अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत ठाकरे गटाला थेट इशारा दिला. मात्र या सर्वांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत गणपती मात्र रस्त्यावर पालखीमध्ये थांबला. यावेळी येथून ये-जा करणारे गणेशभक्त हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि सुरू असलेल्या घडामोडींबाबत रोष व्यक्त करत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed