प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील लांबोरी येथील अंगणवाडी इमारतीच्या बाजूला चंद्रज्योतीचे झाड आहे. अंगणवाडी परिसरात खेळत असताना या मुलांचे लक्ष त्या झाडावर गेलं. त्यांनी बिया खाल्ल्या.काही वेळात त्यांना उलट्या होऊ लागल्या. मुलांना तात्काळ गावातील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उप केंद्रात कुणीच उपस्थित नव्हते.तिथून जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलांना भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मुलांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तिथं बालकांवर उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.
केवळ नावाचाच तालुका
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका अद्यापही विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. तालुका समस्यांचे माहेरघर बनले आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुका स्थळी ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी झाली आहे. पण केवळ शोभेची वास्तू बनली आहे. जिवती तालुक्यात आदिवासी कोलाम बांधवांची संख्या मोठी आहे. या बांधवांना आरोग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.