यंदा अशा राजकीय मंगळागौरींचे प्रमाण आणि त्यात सहभागी महिलांची संख्या प्रकर्षाने वाढलेली दिसली. ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आदी ठिकाणी त्यांचे प्रमाण अधिक होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातही यंदा मोठ्या प्रमाणात राजकीय मंगळागौर सोहळे आयोजित करण्यात आले. मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शहरात महिला आघाडीच्यावतीने कार्यक्रम सादर करण्यात आले होते. तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली भागातील सर्व मंगळागौरीच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावली.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका परिषा सरनाईक यांनीही भव्य स्वरूपात मंगळागौर उत्साह साजरा केला. ठाण्यात शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबरच उद्धव ठाकरे गटाच्या वतीनेही मंगळागौर आयोजित करण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला रश्मी ठाकरे आवर्जून उपस्थित होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह अशा मोठ्या सभागृहांमध्ये मंगळागौरीचे सोहळे रंगले होते.
शिवसेना शिंदे गटाचे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांनी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मंगळागौर आयोजित केली होती. अंबरनाथमध्ये माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि मनिषा वाळेकर यांनी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला मंगळागौर आयोजित केली. त्यानंतर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी श्रावण महोत्सव, आदिवासी महिलांना रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त भेटवस्तू वाटप आणि मंगळागौर असे तीन कार्यक्रम आयोजित केले. माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनीही रोटरी सभागृहात प्रभागातील महिलांसाठी मंगळागौर आयोजित केली होती.
महागड्या पारितोषिकांचा वर्षाव
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, खास महिलांच्या खेळांच्या स्पर्धा, त्यात विजेत्या ठरलेल्या तसेच भाग्यवान विजेत्यांना आकर्षक पारितोषके अशा स्वरूपामुळे या सर्वच सोहळ्यांना ठिकठिकाणचा महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. या सोहळ्यांमध्ये महिलांना सोन्याच्या नथी, एलईडी टीव्ही. पैठण्या, मिक्सर, कुकर आदी गृहपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. त्याचा हिशेब केला तर राजकीय मंगळगौर सोहळ्यानिमित्त ठाणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.
निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
करोनानंतर थंड झालेले निवडणुकीचे वारे आता नव्या वर्षात जानेवारीअखेर जोरदारपणे वाहू लागल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी श्रावण महिन्यातील सण आणि उत्सवांपासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. काही महिला गोविंदा पथके वगळता दहीहंडीत पुरुषांचे वर्चस्व दिसते. त्यामुळे याच महिन्यात येणाऱ्या मंगळागौरी सोहळ्याला राजकीय अधिष्ठान देऊन महिला वर्गाच्या मतांची बेगमी करण्याचा मार्ग नेत्यांनी स्वीकारल्याचे दिसून आले.