• Mon. Mar 16th, 2026

    पीडित महिलांशी सौजन्याने वागा; पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे आदेश

    पीडित महिलांशी सौजन्याने वागा; पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांचे आदेश

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘अत्याचार किंवा अन्य प्रकरणांमध्ये पीडित महिलांना त्रास होणार नाही. त्यांच्याशी; तसेच त्यांच्या कुटुंबीयांशीही सौजन्याने वागा. अशा प्रकरणात संबंधित गुन्हेगार किंवा आरोपीला तत्काळ अटक करण्याबाबत कार्यवाही करा. पीडितांच्या प्रकरणात गैरसंवाद किंवा गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी दिला.

    कलवानिया यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाभर महिला सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पैठण व छत्रपती संभाजीनगर उपविभागांतर्गत येणाऱ्या पैठण, एम. पैठण, बिडकीन, पाचोड, चिकलठाणा, करमाड, फुलंब्री, वडोदबाजार या पोलिस ठाण्यांमधील महिला व मुलींच्या तक्रारीवरून दाखल विनयभंग, बलात्कार, फूस लावून पळवून नेणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांतील पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कलवानिया यांनी पैठण आणि पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली. तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करीत त्यांचे म्हणणेही ऐकूण घेतले.

    ‘तपासादरम्यान पीडिता व त्यांच्या कुटुंबीयांशी सौजन्याने वागावे, तपासात उणिवा न ठेवता आरोपीस तत्काळ अटक करावी. गुन्ह्यांच्या अनुषंगाने साक्षीदारांचे जबाब नोंदवावेत. गुन्ह्यात आरोपीला मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नये. फिर्यादींना विश्वासात घेऊन त्यांचे न्यायालयात जबाब नोंदवावेत. आरोपी जामीनावर असल्यास त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करावी. गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून भक्कम कायदेशीर साक्ष व पुराव्याचे आधारे मुदतीत न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे,’ असे सक्त निर्देश कलवानिया यांनी तपास अधिकाऱ्यांना दिले.
    १० वर्षीय मुलीसोबत नात्यातीलच नराधमाचे संतापजनक कृत्य; मारुन टाकण्याची धमकी दिली अन्…
    पीडितांना पोलिस अधिक्षकांची विचारणा

    विविध प्रकरणात फिर्यादी असलेल्या पीडितांना पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी थेट विचारणा केली. यात पीडितांच्या सांगण्याप्रमाणेच पोलिसांनी फिर्याद घेतली आहे का, गुन्ह्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे का, गुन्हा दाखल करताना कोणी दबाब आणला आहे का किंवा आता आरोपीद्वारे काही त्रास देऊन दबाब आणण्यात येत आहे का, गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपीच्या घरचे अथवा नातलग त्रास देत आहेत का; तसेच तक्रार मागे घेण्यासाठी कोणी पाठलाग करीत आहे का, तपास करणाऱ्या पोलिसांविषयी काही तक्रार किंवा आक्षेप आहे का, पीडितांना पोलिसांची आणखी काही मदत हवी का, तपासाबाबत योग्य ती माहिती पीडितांना देण्यात येत आहे का, त्यांना विश्वासात घेऊन तपास करण्यात येत आहे का,’ अशा अनेक मुद्द्यांवर पीडितांसोबत संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.

    —–

    विश्वास मिळाल्याची पीडितांची भावना

    पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी संबंधित महिलांची विचारपूस केल्यानंतर पीडित महिला व मुलींनी भावना व्यक्त केल्या. या वेळी काहींनी नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने भावाप्रमाणे रक्षणाचे वचन दिल्याबद्दल पोलिस अधीक्षकांचे आभार मानले. ‘या वचनामुळे पीडितांसह अन्य महिला व मुलींना पोलिसांकडून न्याय मिळेल; त्यांच्यासेाबत कोणतीही घटना होणार नाही,’ असे सांगून आपुलकीची व विश्वासाची प्रेरणा मिळाल्याची भावना पीडितांनी व्यक्त केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed