• Sat. Sep 21st, 2024

मराठवाड्यात कुणबी नाहीत का? आरक्षण लढ्याची ठिगणी तिकडेच का पडते? तुमच्या प्रश्नांची उत्तरे..

मराठवाड्यात कुणबी नाहीत का? आरक्षण लढ्याची ठिगणी तिकडेच का पडते? तुमच्या प्रश्नांची उत्तरे..

मुंबई : जालना जिल्ह्यातल्या अंबडमधलं अंतरवाली सराटी हे साडे चार हजार लोकसंख्येचं गाव.. गावात विविध जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. शिवजयंती जेवढ्या उत्साहाने साजरी होते तितकीच आंबेडकर जयंतीही मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. गावात बहुतांश शेतकरी वर्ग… अनेक जण मोलमजुरी करून खातात… याच गावात २९ ऑगस्टपासून मराठवाड्यातील मराठा समाजाला सरकरट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. या उपोषणाच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात. आंदोलनाचा लढा नेहमी मराठवाड्यात तीव्र का असतो? आंदोलनाची ठिणगी नेहमी मराठवाड्यातून कशी काय पडते? विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मराठा समाजाच्या दाखल्यांवर कुणबी आहे मग मराठवाड्यातच ‘कुणबी’ का नाहीये? अशा धगधगत्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न…

मराठवाड्यातच आरक्षण लढा तीव्र का होतो?

मराठवाडा हा कमी पावसाचा प्रदेश… दुष्काळ तर मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला… टंचाई, पावसाचा अभाव हे शब्द मराठवाड्याला नवे नाहीत. शेतीचे उत्पन्न बुडालेले आणि पिण्याचे पाणी आटलेले, अशीच स्थिती वर्षानुवर्षे मराठवाड्यात असते. अनियमित पाऊस, साधन सामग्रीचा जास्त खर्च, बाजारभावातील अनिश्चितता, अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठी संख्या असल्याने त्यांची आर्थिक स्थिती उंचावत नाही.

तसेच पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्याचवेळी आपल्या पाल्यांना महागलेलं शिक्षण देणं पालकांना शक्य होत नाही. तसेच मराठवाड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे वाढत्या बेरोजगारीने मराठा तरुणांमध्ये वैफल्य आहे. दुसरं म्हणजे विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची संख्या कमी आहे. त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी नेहमी जोर धरते, असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील सांगतात.

इतर विभागात कुणबी आहेत मग मराठवाड्यात अगदी तुरळकच का आहेत?

महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांमध्ये (ओबीसी) कुणबींचा समावेश होतो. मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. विदर्भ आणि खान्देशात मराठा समाज ‘कुणबी’ असून त्यांचा समावेश इतर मागास प्रवर्गात आहे. त्यामुळे मराठवाड्यातही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार संयुक्त महाराष्ट्रात विलिन होण्याअगोदर मराठवाड्यात मराठ्यांना आरक्षण होतं. पण नंतर ते आरक्षण मिळालं नाही. मराठवाड्यातील मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी शासनदरबारी न झाल्याने मराठा समाजाला कुणबी दाखला मिळत नाही. त्याचमुळे मराठवाड्यातील मराठा समाजास ‘कुणबी प्रमाणपत्र’ देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी शासनाने समिती स्थापन केलीये. मात्र, समितीच्या अहवालाबाबत स्पष्टता नसल्याने कुणबी प्रमाणपत्राचा तिढा निकाली निघालेला नाहीये. समितीच्या अहवालानुसार शासनाने ठोस निर्णय घेतला असता तर मराठवाड्यात आरक्षणाचा उद्रेक झाला नसता, असे अभ्यासकांना वाटते.

या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठा समाजास ‘कुणबी’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सूसुत्रता आणण्यासाठी आणि अभ्यासपूर्वक शिफारशी सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती नेमली आहे. २९ मे २०२३ रोजी नेमलेल्या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करणे अपेक्षित होते.

कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षणाचा मार्ग खुला होईल पण राजकीय गैरसोय असल्याने प्रश्न अधांतरी

दरम्यान, मराठवाड्यातील आंदोलनाच्या केंद्रस्थानी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आहे. या प्रमाणपत्रामुळे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाचा मार्ग खुला होऊ शकतो. मात्र, ‘ओबीसी’ प्रवर्गाच्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करणे राजकीय गैरसोयीचे असल्याने प्रश्न अधांतरी आहे.

रस्त्यावर उतरुन संघर्ष, आरक्षणासाठी जमीन विकली, गल्ली ते दिल्ली हादरवणारे मनोज जरांगे पाटील कोण ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed