दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाने थेट सरकारमधून बाहेर पडण्याचे साकडे घातले आहे. ‘दादा तुम्ही आमचे नेते आहात; मग सरकारमधून बाहेर पडा,’ असे आवाहन मोर्चावेळी आंदोलकांनी केले. बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीने कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात करण्यात आली. या वेळी ‘राज्य सरकारचा भरला घडा… अजित पवार सरकारमधून बाहेर पडा…’ अशा घोषणा देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच बारामतीकरांनी अजित पवार यांचा मोठा नागरी सत्कार केला होता. मात्र, आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर बारामतीकर आक्रमक झाले असून, त्यांनी अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर आणि अपर पोलीस अक्षीक्षक आनंद भोईटे यांना समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. एक अपर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरीक्षक यांच्यासह शंभर पोलीस कर्मचारी, वीस होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आंदोलनावेळी तैनात करण्यात आल्या होत्या. दरम्यान या सर्व प्रकरणावर राज्य सरकारने पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, सरकारमधून बाहेर पडा, अशा घोषणा दिल्याचं माझ्यापर्यंत आलं आहे. त्यानंतर मी काटेवाडीच्या सरपंचांना फोन केला आणि तेथील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अशी घोषणा देणारे आपल्या गावातील नव्हते, ते बाहेरचे होते, अशी माहिती मला सरपंचांनी दिली. तो कोण होता, कुठला होता माहिती नाही. उद्या कुणीही उठून काहीही मागणी करेल, याला काय अर्थ आहे. तो निदान सरपंच-उपसरपंच तरी असायला हवा होता, असं अजित पवार म्हणाले.