भाजपचा मुख्य कार्यकर्ता सतरंजी उचलतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. नागपुरातही शिवसैनिकांची अशीच स्थिती आहे. निष्ठावान शिवसैनिक घरी बसला आहे. त्यांची काम करण्याची इच्छा असली तरी बाहेरून आलेले आणि मुंबईतील नेते मंडळी शिवसैनिकांचा अवमान करतात, याकडे केव्हा लक्ष द्याल, असा सवाल दक्षिण नागपूरचे विभागीय संघटक राजेश कनोजिया यांनी केला.
राजेश कनोजिया काय म्हणाले?
गद्दारांना धडा शिकवण्याची जिद्द शिवसैनिकांमध्ये आहे. त्यासाठी बळ देण्याऐवजी अवमान केला जातो. हा अवमान आणखी किती सहन करणार. सर्व प्रमुख पदावर बाहेरून आलेले आहेत. शिवसैनिकांमध्ये चैतन्य, उत्साह आणून त्यांचा विश्वास उंचावण्याऐवजी आपले पद टिकवण्यासाठी मुंबईतील नेत्यांची जी हुजुरी करण्यात त्यांचा वेळ जातो. निष्ठावान शिवसैनिकांची बाजू कुणीच घेत नाही. त्यांच्या व्यथांची दखल घेतली जात नाही. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष बळकट करण्यासाठी कुठलेच कार्यक्रम, नियोजन नाही, याकडेही कनोजिया यांनी लक्ष वेधले.
केंद्र व राज्याचे धोरण कसे चुकीचे आहे, राज्यात कशी राजकीय उलथापालथ झाली, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जात नाही. महागाई, बेरोजगारी, देशावरील कर्ज, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवरील अत्याचार यावर कुठलेही आंदोलन नाही. शिवसैनिकांचा आवाज दबला गेला आहे. मुंबईचे नेते आले की बैठक होते, इतकीच शिवसेना राहिली आहे. शिवसैनिक हा रस्त्यावर गायब झाला आहे, अशी खंतही कनोजिया यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेबाबत काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या स्थितीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.