• Sat. Jun 6th, 2026
    Dhanashree Jagtap Case : धनश्री जगताप मृत्यू प्रकरणात पोलिसांवर आरोप; 10 दिवस उलटूनही सासू-सासरे फरार

    धनश्री जगताप मृत्यू प्रकरणात तिच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात कारवाई करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचादेखील आरोप धनश्रीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे धनश्रीच्या माहेरच्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अरुण बाबर, पंढरपूर : “माझ्या मुलीचा मृत्यू ही आत्महत्या नसून तो एक संशयास्पद मृत्यू आहे. १० दिवस उलटूनही अद्याप सर्व आरोपींना अटक का झाली नाही?” असा संतप्त सवाल मंगळवेढा तालुक्यातील धनश्री संदीप जगताप यांच्या माहेरच्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी पतीला अटक झाली असली तरी सासू-सासरे अद्याप फरार आहेत. तसेच, मयत धनश्रीचा दीर पोलीस खात्यात असल्याने तपासात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोप धनश्रीचे वडील आप्पासो श्रीरंग मोरे यांनी केला आहे. न्याय न मिळाल्यास एसपी ऑफिससमोर उपोषण आणि तीव्र आंदोलनाचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.

    नेमके प्रकरण काय?

    मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील रहिवासी आप्पासो मोरे यांची मुलगी धनश्री हिचा विवाह संदीप गौतम जगताप याच्याशी झाला होता. ४ मार्च २०२६ रोजी धनश्रीचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी ७ मार्च रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती संदीप जगताप याला अटक केली आहे, मात्र सासरे गौतम दाजी जगताप आणि सासू रंजना गौतम जगताप हे अद्याप फरार आहेत.

    पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न?

    धनश्रीचे वडील आप्पासो मोरे यांनी १४ मार्च रोजी मंगळवेढा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. धनश्रीचा दीर, सत्यजित गौतम जगताप हा स्वतः पोलीस कर्मचारी आहे. त्याच्यावर वारंवार मानसिक त्रास दिल्याचा आरोप असूनही पोलीस त्याच्याविरोधात तक्रार नोंदवून घेत नसल्याचे पत्रात म्हटले आहे. या गुन्ह्यात सत्यजितचाही सहभाग उघडकीस येऊ शकतो, त्यामुळे त्यालाही आरोपी करून अटक करण्याची मागणी मोरे कुटुंबीयांनी केली आहे.

    कुटुंबीयांनी उपस्थित केलेले १० खळबळजनक सवाल:

    सोशल मीडियावर ‘मला न्याय मिळेल का?’ या मथळ्याखाली कुटुंबीयांनी तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत:
    १. मुलगी स्वतःचा मोबाईल घरी ठेवून विहिरीकडे कशी गेली, विशेषतः जेव्हा तिला विहीर कुठे आहे हेच माहीत नव्हते?
    २. जर ती विहिरीकडे गेली, तर तिचा मोबाईल सासूकडे कसा आला?
    ३. विहिरीत २० फूट पाणी असताना आणि विहिरीला पायऱ्या नसताना बॉडी कोणी आणि कशी बाहेर काढली? याचा पंचनामा कुठे आहे?
    ४. सासू व इतर नातेवाईकांनी आधी ‘मुलगी हरवली’ असे सांगितले, मग त्यांना अचानक कसे समजले की ती त्यांच्याच विहिरीत पडली आहे?
    ५. पती संदीप याने वारंवार केलेल्या छळाचे पुरावे मोबाईलमध्ये असूनही ते का तपासले गेले नाहीत?
    ६. सर्व आरोपींचे कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशन का तपासले जात नाहीये?

    तीव्र आंदोलनाचा इशारा

    वारंवार पोलीस स्टेशनचे उंबरे झिजवूनही तपास पुढे सरकत नसल्याने मोरे कुटुंबीय हतबल झाले आहेत. “फरार सासू-सासरे आणि दीर सत्यजित यांना तात्काळ अटक करून योग्य तपास न केल्यास, आम्ही सर्व नातेवाईक पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयासमोर उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन करू,” असा सज्जड इशारा धनश्रीच्या वडिलांनी दिला आहे. आता मंगळवेढा पोलीस या प्रकरणात काय पावले उचलतात आणि धनश्रीला न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा