• Sat. Sep 21st, 2024

मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर

मुंबईजवळच्या ‘या’ भागातील पाणी आरोग्यास हानिकारक; प्रदूषण अहवालातून धक्कादायक चित्र समोर

वैष्णवी राऊत, वसई: वसई-विरार महापालिका क्षेत्राला वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणाचा भीषण विळखा पडल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती दर्शवणाऱ्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. तब्बल आठ वर्षानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आयआयटीच्या पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने नऊ लाख रुपये खर्चून हा अहवाल तयार केला आहे. शहरात धुळीचे प्रमाण वाढले असून पाण्यामध्ये विघातक घटक म्हणजेच टीडीएस वाढल्याची गंभीर निरीक्षणे या अहवालात नोंदवण्यात आली आहेत. कचऱ्यामुळे वाढत्या प्रदूषणाकडेही या अहवालाने लक्ष वेधले आहे.

जलसमृद्ध समजल्या जाणाऱ्या वसई-विरार शहरातील बोरिंग आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नसल्याची गंभीर बाब या अहवालात समोर आली आहे. पाण्यातील क्षार (टीडीएस) आणि हायड्रोजन (पीएच) यांची मात्रा वाढल्याचेही अहवालात समोर आले आहे. टीडीएस २०० पर्यंत असणे आवश्यक असताना, वसईतील पाणी क्षारयुक्त झाल्याने येथील टीडीएस ३५० ते ८०० पर्यंत गेल्याचे भीषण वास्तव आहे. औद्योगिक कंपन्यांचे पाणी नदीनाल्यांमध्ये सोडले जात असल्याने नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित झाले आहेत. विविध प्रदूषणकारी घटक मातीत मिसळल्याने सुपीक समजल्या जाणाऱ्या वसईतील मातीचा स्तर खालावला आहे. परिणामी शेतीउत्पादन घटले आहे.

केवळ एक प्रदूषणमापक यंत्र

वसई-विरार शहरात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठीचे केवळ एकच यंत्र वसई पश्चिम येथे आहे. हे यंत्र शहरातील प्रत्येक प्रभागात असणे आवश्यक आहे. विरार-बोळींज भाग व पेल्हार-वालीव भाग अतिशय प्रदूषित असल्याचे म्हटले आहे. उद्योगांतील प्रदूषणासोबत धूळ व आवाजाचे प्रदूषण खूप आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ० ते ५० या मर्यादेत असमे आवश्यक असते. मात्र वसईत तो १७०पर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

खारं नको म्हणून नदीचं गढूळ पाणी पिण्याची वेळ; हंडाभर पाण्यासाठी नदी पात्रात उतरून महिलांची कसरत

अहवालातील निरीक्षणे

– बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने महापालिका क्षेत्रातील हरित पट्टा कमी होत आहे. तुंगारेश्वर व किनारपट्टी भाग सोडल्यास झाडांचे प्रमाण नगण्य आहे.

– शहरात रोज ९७५ टन कचरा तयार होतो. पण जेमतेम ५०० ते ५५० टन कचरा उचलला जातो. त्याचेही वर्गीकरण होत नाही. कचरा व्यवस्थापनाअभावी गटारे, नद्या, खाड्या, समुद्र, जमीन, पाणी प्रदूषित होत आहे.

– शहरात पालिकेचे केवळ एक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. लोकसंख्येनुसार पाच-सहा केंद्रे आवश्यक आहेत. खासगी प्लांटचे योग्य परीक्षण होत नाही.

– खाड्यांमधून अति वाळूउपसा होत असल्यामुळे नद्या, खाड्या मृत होण्याची भीती आहे.

अहवालात सुचवलेल्या उपाययोजना

– महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये सीएनजी, विद्युत वाहने समाविष्ट करावीत.

– वारंवार मृदा तपासणी करून मृदेचा स्तर उंचावणे आवश्यक आहे. पर्जन्यजल व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यास प्रोत्साहन द्यावे.

– रस्तेसफाई, पाण्याची फवारणी करून धूळ रोखावी.

– रस्त्याच्या दुतर्फा देशी झाडे लावावीत. बांधकामासाठी तोडलेल्या झाडांचे प्रत्यारोपण करून निगा राखावी.

– प्रदूषण रोखण्यासाठी जागोजागी कारंजी, हवा शुद्धिकरण यंत्रे उभारावीत.

वसई-विरारमध्ये हवा, ध्वनी आणि पाणी या तीनही क्षेत्रांत प्रदूषण झाल्याचे अहवालातून दिसून येते. अहवालातील सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पालिकेने हा अहवाल नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती गरजेची आहे.

– मॅकेन्झी डाबरे, पर्यावरणवादी कार्यकर्ते, वसई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed