मणिपूर मध्ये झालेल्या घटनेबद्दल सरकार चर्चा करायला तयार नाही. महिलांचं संरक्षण करायला सरकार तयार नाही, अशा सरकर ला सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार म्हणाले.
देशभरात केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. १४ महिने त्यांना आत ठेवण्यात आलं त्यांनी भूमिका बदलली नाही. सामनाचे संपादक संजय राऊत हे लिहितात, टीका करतात म्हणून त्यांना आत टाकलं. नवाब मलिक हे केंद्र सरकारवर टीका करत होते म्हणून त्यांना ही आत टाकलं गेलं होतं, असं शरद पवार म्हणाले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मला ही ईडी ची नोटीस आली होती. ते उद्या या म्हणाले मात्र मी आताच येतो म्हणून निघालो मात्र त्यानंतर पोलिसांनी घरी येऊन हात जोडून येऊ नका म्हणून विनंती केली होती. मी कधी त्या बँकेतून कर्ज घेतलं नाही केवळ भीती घालण्याचा प्रयत्न केला गेला होता. ज्याची भूमिका सत्याची आहे ते घाबरत नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं.
आज ईडीची नोटीस अनेक जणांना दिली की काहींनी भूमिका बदलली. कोल्हापुरात ईडीची नोटीस आली त्याला सामोरे जातील वाटलं मात्र वेगळंच घडलं आहे. घरातील महिलांनी सांगितलं आमच्यावर अन्याय करताय आम्हाला गोळ्या घाला मात्र हे धाडस घरच्या प्रमुखांनी दाखवल नाही. त्यांनी भाजप सोबत जाण पसंद केलं, असं म्हणत शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता टीका केली.
दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या टीकेवर हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्यासोबतचे मंत्री काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.