संजय राऊत राज्यसभेचे खासदार असताना त्यांनी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी का? या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झाला नसला तरी अशा प्रकारची कुजबूज पक्षांतर्गत सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील काही नेत्यांकडून अशा प्रकारची इच्छा सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सदर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना टक्कर देण्यासाठी संजय राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सध्या मनोज कोटक हे खासदार आहेत. याआधी भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे खासदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेने २०१९ साली येथून किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर ही जागा मनोज कोटक यांना भाजपकडून देण्यात आली होती. तेव्हाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असल्याने मनोज कोटक यांच्या विजयाचा मार्ग सोपा होता.
भाजपाचे उमेदवार मनोज कोटक यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांनी ही निवडणूक लढवली होती. परंतु संजय पाटील हे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर संजय पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर सद्यस्थितीत या लोकसभा मतदारसंघात तीन आमदार भाजपचे दोन शिवसेना ठाकरे गटाचे आणि एक समाजवादी पक्षाचा आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडी म्हणून विचार करताना शिवसेना ठाकरे गट त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष या जागेसाठी दावा सांगण्याची शक्यता आहे.
