• Sat. Sep 21st, 2024
केळीच्या घडाचे ९२ किलो वजन; १५ वर्षांपासून विक्रमी उत्पादन, इंदापुरच्या शेतकऱ्याला कृषी गौरव पुरस्कार

इंदापूर: पंधरा वर्षापासून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील कपिल जयप्रकाश जाचक असे पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सलग बावीस वर्ष निर्यातक्षम केळी उत्पादन घेणारा शेतकरी म्हणून इंदापूरच्या कपिल जाचक यांची ओळख आहे. जाचक यांनी त्यांच्या ज्ञानाचा फायदा इतर शेतकऱ्यांना करून दिला आहे. सोलापूर जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव कपिल जयप्रकाश जाचक यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सदर पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी कपिल जाचक यांना सपत्नीक हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला.

केळी उत्पादक कपिल जाचक हे सन २००० पासुन इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथे त्यांच्या परिनीता फार्ममध्ये नविन तंत्रज्ञानाचा वापर करून केळी आणि ऊस पिकाचे भरघोस उत्पन्न घेत आहेत. जाचक यांची फिलीपिन्स या देशातील शास्त्रज्ञांबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची देवाण घेवाण असल्यामुळे त्यांनी २००८ साली दोन एकरामधील २८ टन केळी निर्यात केली. पुढे २००५ ते २०१२ या कालावधीमध्ये केळी उत्पादन व मार्केटींग केले. सन २०१६ मध्ये एका एकरात केळीचे १४५२ रोपे जोडओळ पध्दतीने लागवड करुन ५२ टन इतके विक्रमी उत्पादन घेतले. त्याच प्लॉट मध्ये केळीच्या घडाचे ९२ किलो पर्यंत वजन भरले. त्या केळीच्या घडाला २० फण्यासह त्याची उंची ५’३” होती. सध्या दोन एकरात २९०० रोपांची जोडओळ पध्दतीने लागवड करून ७० टन निर्यातक्षम केळी उत्पादनाचे उदिष्ट आहे. सदर प्लॉट मध्ये ९ फण्या राखलेल्या केळीचे उत्कृष्ठ दर्जाच्या मालाचे उत्पादन घेवून त्याचे निर्यातीसाठी लागणारे निकष दाखवून दिले.

मानाच्या पाचव्या गणपतीचं आगमन; टिळक पंचांगानुसार केसरी वाड्यातील गणेशोत्सवाला सुरूवात

केळी पिकामध्ये जोडओळ ही लागवडीची नवीन पध्दत निर्माण करून त्याचे फायदे त्यांनी पटवून दिले. केळी पिकात महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्कर्टिंग बॅगेचा वापर करुन निर्यातक्षम उत्पन्न घेवून कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे मार्फत शेतकरी गटांना त्याचे महत्व पटवून देवून प्रात्यक्षिक व शिवारफेरीचे आयोजन केले. जाचक यांनी केळी पिकासाठी पुणे, अकलुज व सांगली येथे जात व्याख्याने दिली. तसेच त्यांनी शेतातील बोअरवेलसाठी २००१ पासुन पुर्नभरण करून पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याचा यशस्वीरित्या प्रयोग व प्रसार केला आहे. जाचक यांच्या संपुर्ण शेतामध्ये ड्रिप इरिगेशन सेंट्रलाईज सिस्टीम पध्दतीने केलेली आहे. त्यांना मिळालेला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार हा आजवर शेतीत केलेल्या कामाची पोहोच पावती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed