• Sun. Mar 15th, 2026

    शेतकऱ्यांनो पिकांवर गोगलगायींचं आक्रमण? घाबरु नका, नियंत्रणासाठी कृषि विभाग करतंय मार्गदर्शन

    शेतकऱ्यांनो पिकांवर गोगलगायींचं आक्रमण? घाबरु नका, नियंत्रणासाठी कृषि विभाग करतंय मार्गदर्शन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : खरीप पिकांवर आणि फळझाडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. कमी पावसामुळे कीड आणि बुरशीने खरीप पिके संकटात सापडली आहेत. कृषी विभागाने आता गोगलगायींच्या नियंत्रणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमावर भर दिला आहे.

    पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे गोगलगायींचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मागील वर्षी लातूर आणि छत्रपती संभाजीनगर कृषी विभागात गोगलगायींमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली होती. पावसाने ताण दिल्यामुळे मोसंबीची फळगळ सुरू आहे. त्यातच गोगलगायी झाडांचे नुकसान करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि मोसंबी संशोधन केंद्राने चित्तेपिंपळगाव येथे मोसंबी शंखी गोगलगाय व्यवस्थापनावर प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

    ‘गोगलगाय निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी मोसंबी झाडावर चढून साल, पाने खाऊन नुकसान करते. झाडाच्या खोडास पावसाळ्याच्या सुरवातीस बोर्डोपेस्ट लावल्यास ही कीड झाडावर जात नाही. त्यातून मोसंबी झाडाचा बुरशी आणि गोगलगायीपासून बचाव करण्यास मदत मिळते,’ असे पाटील यांनी सांगितले.

    कीडीने पाने खाण्यास सुरुवात केल्यामुळे फवारणीशिवाय पर्याय उरलेला नाही. गोगलगायी वेचून मिठाच्या पाण्यात टाकण्याचे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केले होते. मात्र, शेतकऱ्यांनी दुसऱ्या पर्यायांची विचारणा केली आहे. गोगलगायींचा आकार आणि संख्या वाढल्याने सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे.

    जनजागृती मोहीम

    – छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांतील काही भागांत गोगलगायींचा प्रादुर्भाव
    – कपाशी, सोयाबीन या पिकांना फटका बसण्याची शक्यता.
    – गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती मोहीम.

    विहिरीनं तळ गाठला, वीजेअभावी पिकं करपली ; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

    पिकामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक उपाययोजना केल्यास या किडीचे नियंत्रण प्रभावीपणे करता येते. फळझाडावर गोगलगायी असल्यास बोर्डोमिश्रण किंवा कॉपर सल्फेटच्या द्रावणांची फवारणी केल्यास नियंत्रण करणे सोपे होईल.- डॉ. संजय पाटील, कृषी शास्त्रज्ञ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed