पवार म्हणाले, अनेकांनी मला सुप्रिया यांचे संसदेतील भाषण ऐकल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही त्यांना लांबून बघितले. पण संबंध संसदेत त्यांच्या भाषणाकडे बघण्याचा जो दृष्टीकोन होता तो एकप्रकारे महाराष्ट्रातील भगिनींचा सन्मान करणारा होता. याचे कारण नीतीशी त्यांनी तडजोड केली नाही. विचाराने त्या पुढे जात आहेत. आपली भूमिका तत्वाची आहे. पुरंदरला विधानसभेला आपल्या पक्षाचा उमेदवार नव्हता. आपल्या मित्रपक्षाचा उमेदवार होता. तेथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत तुम्ही राष्ट्रवादीचे काम केले. तेथे तुम्ही पक्षाला मत मागितले. घड्याळ ही खूण सांगितली. त्यामुळे लोकांनी तुम्हाला साथ दिली.’
उद्या तुम्ही हा पक्ष आणि खूण मी सोडली असे सांगितले तर लोकांना या गोष्टी पटत नाहीत. कोणी येत असते, कधी आपले जात असतात. याची चिंता करायची नसते. आपला विचार, आपली दिशा ही कधी सोडायची नसते, असे पवार पुढे म्हणाले.
मी महाराष्ट्रभर यापूर्वी अमूक एकाला मत द्या असे सांगितले. आता ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना मते द्या असे सांगितले तर ते माझ्या पचनी पडणार नाही. सत्ता येते आणि जाते पण सामान्यांना दिलेला शब्द कधी सोडायचा नसतो. त्यापासून बाजूला जायचे नसते, असेही पवार पुढे म्हणाले.
पुरंदर तालुका हा इतिहास निर्माण करणारा तालुका आहे. या तालुक्यात अनेकांनी सामान्य माणसांसाठी संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य अत्रे यांनी योगदान दिले होते. अशी दृष्टी व कर्तृत्व असणारे लोक पुरंदरमधून आले. त्या दिशा देण्याने राज्य बदलले. लोक मला विचारतात कसे होणार, काय होणार. या सगळ्या स्थितीत मी लोकांना आश्वासित करत आहे असेही पवार म्हणाले.