• Sat. Sep 21st, 2024

शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात

शेतकरी हवालदिल; शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाने दडी मारल्याने धानाचे पीक धोक्यात

राजू मस्के, भंडारा : जुलै महिन्यात संततधार पावसानंतर गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाच्या सरासरीत घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकाऱ्यांची धान रोवणी आटोपली असताना पाऊस बेपत्ता झाल्याने धान रोवणी सुकण्याच्या मार्गावर आहे. येणारा आठवडाही कोरडा गेला तर, पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा पडण्याची सुरुवात झाली आहे.

पऱ्यांची वाढ जोमाने व्हावी म्हणून सेंद्रिय व रासायनिक खत पिकांना दिले जाते. मात्र शेतात पाणी नसल्याने खत देण्यास व्यत्यय येत आहे. त्यामुळे पिकांची वाढ ही एक प्रकारे खुंटली आहे. सिंचनाची सोय असणारे शेतकरी मोटारद्वारे पाण्याची व्यवस्था करून पऱ्हे जिवंत ठेवत आहेत. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांनी आपल्या शेतामधील पऱ्हे जगावे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आता पावसाने दडी मारल्याने पावसाची सरासरी घसरली आहे. १ जून ते १२ ऑगस्टपर्यंत सरासरी ५०० मिमी पाऊस होणे अपेक्षित होते.

रोवणी सुकण्याच्या मार्गावर

रोवणी आटोपून जवळपास पंधरा दिवस झाले आहेत. रोवणीनंतर धानाला पाण्याची गरज असते. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे झालेली रोवणी सुकण्याच्या मार्गावर असून शेतजमिनीला भेगा पडण्याची सुरुवात झाली आहे.
मराठवाड्यात पावसाची दडी; विभागात यंदा पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता, पिकांवर बुरशी
पावसाअभावी उकाडा वाढला

पाऊस दहा दिवस लांबल्याने तापमान वाढले आहे. तापमान ३४ अंशावर गेले आहे. पावसाअभावी उकाडा वाढला असून नागरिक घामाघूम होत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑगस्ट महिन्यात उकाड्याचा पाऊस बरसला नाही तर डासांचा प्रकोप वाढतो. पावसाच्या दडीमुळे डासांचा उपद्रव जास्त वाढला असून दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे. अशातच मलेरिया व डेंग्यूसारखे आजार बळावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed