शिवसेनेत फूट पडून आता जवळपास वर्ष होत आले असून, या कालावधीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे यांच्या गटात येत आहेत. असे असताना त्यांच्याच पक्षातील कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून राजीनामा देण्याचा इशारा दिला. त्यानंतर जोगेश्वरीमधला शिवसेना शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे.
शाखाप्रमुख असलेले प्रकाश शिंदे म्हणाले, विभागप्रमुख विजय धिवार यांची मनमानी आम्ही सहन केली. आमच्या तक्रारी आम्ही वरिष्ठ नेते संजय मोरे, सिद्धेश कदम आणि नरेश म्हस्के यांच्या कानावर घातल्या. पण तरीही विजय धिवार यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे शाखा क्रमांक ७७ मधील जवळपास २०० पदाधिकारी तर जोगेश्वरीतील जवळपास ४०० पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत.
विभागप्रमुख विजय धिवार यांना पक्षाची कोणतीही चिंता नाही. ते महिलांचा मानसिक छळ करतात. आम्हाला दडपण आलंय. जीव द्यावासा वाटतोय. विभागप्रमुख महिलांशी बोलताना इतक्या घाणेरड्या शब्दांत बोलतायेत की आम्ही शब्दात सांगू शकत नाही. त्यांच्या कामाला कंटाळून आम्ही प्रभागातील महिला राजीनामा देणार आहोत, अशा संतापजनक भावना जोगेश्वरी विधानसभेच्या संघटक सुरेखा सुर्वे यांनी व्यक्त केल्या.
रामदार भाईंचे सुपुत्र देतायेत, कंटाळून राजीनामा देत आहोत
‘आमच्या विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिद्धेश कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देत छळ करायला सुरुवात केली आहे. त्याला कंटाळून आम्ही राजीनामा देत आहोत’, अशी प्रतिक्रिया कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्राचे शिवसेना विभागप्रमुख विकास गुप्ता यांनी दिली. तर ‘मालाडमध्ये सुरुवातीपासून काम करतोय. मात्र आता काहीही कारण नसताना लोकांना पदावरून काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पदाधिकारी चिंताग्रस्त आहेत.. आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार आहोत’, असे मालाडचे विधानसभा संघटक नागेश आपटे म्हणाले.