कोरोना काळात राजेश क्षीरसागर यांच्या मुलाने कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओचा हा व्यवहार केल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे. यातच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने जयप्रभा स्टुडिओची जागा महापालिकेला हस्तांतरित करून घेण्याचं परिपत्रक काढून ज्या संस्थेने ही जागा घेतली, त्यांना पर्यायी जागा देण्याच्या अन्यथा विकास हस्तांतरणीय हक्क टीडीआर पद्धतीने मोबदला देण्याच्या सूचना राज्य शासनाने महापालिकेला केले आहेत. त्यामुळे राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत साखर पेढेही वाटले होते. ज्यावेळी आपण कुठल्याही चुकीच्या पद्धतीने व्यवहार केला नसल्याचा पुनरुच्चार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
मात्र आज ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी पत्रकार परिषद घेत राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केला. पानपट्टी चालक सचिन राऊत यांना पुढे करून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरकरांना चुना लावल्याची टिका शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केली आहे. याशिवाय जयप्रभा स्टुडिओचा व्यवहारच संशयास्पद असून याप्रकरणी क्षीरसागर कटुंब आणि सचिन राऊत यांना अटक करून त्यांची ईडी चौकशी आणि नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही यावेळी इंगवले यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना रविकिरण इंगवले म्हणाले, महाराष्ट्र राज्य शासनाच्या ताब्यातील जागा सि.स.नं. २८१४/क (जयप्रभा स्टुडिओ) ही जागा क्षीरसागर कुटुंब आणि सचिन राऊत (पानपट्टी चालवणारा) यांनी चुकीच्या पध्दतीने शासनास आणि मिळकत धारकास घेऊन चुकीच्या पध्दतीने कागदपत्रे दाखवून दि. १५/०२/२०२० रोजी खरेदीपत्र केले असून मुळात संस्थान काळात पेंढारकर कुटुंबियांना शर्ती आणि अटींवर ही जागा संस्था नावे दिली होती. ज्यामध्ये अट स्टुडिओसाठी सदर जागेचा उपयोग करावा आणि ही जागा शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतर करता येणार नाही, असे म्हणाले होते. तरीही पेंढारकर आणि लता मंगेशकर यांनी वेगवेगळी शक्कल लढवत लिलाव पध्दतीने ती जागा लता मंगेशकर यांना हस्तांतरीत केली. त्याचवेळी अटी आणि शर्तीचा भंग झाला होता.
त्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाची फसवणूक किंवा विना परवाना मंगेशकर कुटुंबियांनी ती जागा सचिन राऊतांना विकली. खरेदी पत्रामध्ये ६,५०,००,०००/- सहा कोटी पन्नास लाख रुपये एका रकमेने पानपट्टी चालवणारा सचिन राऊतने भरले आहे. काळा पैसा किती दिला असेल त्याचा हिशोबच नाही. यातुनच एक पानपट्टीवाला इतका पैसा कुठून आणतो, यासाठीच त्याची तेलगी स्टॅम्प घोटाळ्याप्रमाणे नार्कोटेस्ट घेण्यात यावी, अशी मागणी इंगवले यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, यासाठी उद्या ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन ही देण्यात येणार आहे. तसेच निदर्शने ही करण्यात येणार असून आम्ही लवकरच न्यायालयात देखील जाणार आहोत, असे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामुळे आता या प्रकरणावर मुख्यमंत्री कोणता निर्णय घेणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागलेलं आहे.