• Sat. Sep 21st, 2024
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्द्यापासून रद्द, कारण…

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २२ अब्ज घनफूट (टीएमसी), म्हणजे ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरात दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्यापासून (सोमवार) रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस महापालिका आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रसन्न जोशी, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला असल्याने शहरातील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील एकत्रित पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. असे असतानाही पुणेकर मात्र दर गुरुवारच्या ‘पाणी बंद’मुळे हैराण झाले असून, ही पाणीकपात रद्द करावी, अशी आग्रही मागणी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सत्ताधाऱ्यांकडे लावून धरली होती. पालकमंत्री पाटील यांनी या पार्श्वभूमीवर तातडीची आढावा बैठक घेऊन पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका केली आहे.

महाराष्ट्र पाऊस: राज्यातील काही जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती?
यंदाचा पावसाळी हंगाम सर्वसाधारण पावसाचा राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता; तसेच या पावसाळ्यात एल निनो सक्रिय असल्याचेही सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने १५ जुलैऐवजी ३१ ऑगस्टपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे, असे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार पालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. शहरात १८ मे पासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

महापालिका खडकवासला आणि भामा आसखेड या दोन धरणांतून दररोज सुमारे १६५० ‘एमएलडी’ इतके पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुणेकरांना पिण्यासाठी, वापरासाठी देण्यात येते. दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने सुमारे पाव ‘टीएमसी’ पाण्याची महिन्याभरात बचत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पुणेकर गेल्या अडीच महिन्यांपासून पाणीटंचाईला सामोरे जात होते. पाणी कपात गुरुवारी करण्यात येत असली, तरी त्याचा परिणाम पुढील दोन दिवसांच्या पुरवठ्यावर होत होता. त्यामुळे प्रत्यक्षात आठवड्यातील तीन दिवस पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर पाणीसाठा ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने पाणीकपात तातडीने रद्द करावी, अशी मागणी राजकीय क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्थांकडूनही करण्यात आली होती.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा (अब्ज घनफूट (टीएमसी)

एकूण पाणीसाठा- २१.८४ टीएमसी (७४.९२ टक्के)

गेल्या वर्षी या वेळचा पाणीसाठा- २१.४६ टीएमसी (७३.६३ टक्के)

खडकवासला १. ९३ टीएमसी (९७.६० टक्के)

पानशेत – ८.५५ टीएमसी (८०.२५ टक्के)

वरसगाव- ९.३४ टीएमसी ( ७२.८४ टक्के)

टेमघर- २.०३ टीएमसी (५४.६९ टक्के)

वर्षभरात पिण्याचे पाणी व शेतीसाठी साधारण ३० ‘टीएमसी’ पाण्याची आवश्यकता असते. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा हा गतवर्षीपेक्षा अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. शेतीसाठी लागणारे पाणीही देण्यात यावे; तसेच धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलावही भरण्यात यावेत. येत्या काळात पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील.

– चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

आकाश ढगाळ, पावसाच्या हलक्या सरी

पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चौफेर हजेरी लावलेल्या पावसाचा जोर रविवारपासून ओसरणार आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. मात्र, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि काळोख होता. दुपारी काही वेळ आणि संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवला. रात्री साडेआठपर्यंत शहरात १.२ मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात आणि घाट माथ्यावर जोराचा पाऊस पडला. पुढील काही दिवस पावसाचा जोर आता ओसरणार असल्याने शेतकऱ्यांना आता शेतीची कामे पूर्ण करता येतील, असे आयएमडीने सांगितले आहे.

राज्यातील प्रमुख ३२ धरणे ५५ टक्के भरली, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्के तूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed