मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोहटार येथील ईश्वर नामदेव पाटील हे पत्नी प्रमिलाबाई तसेच मुले सुना-नातवंड या परिवारासह वास्तव्यास होते. ईश्वर पाटील हे एस. टी महामंडळात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले होते. दोघां पतीपत्नीला आध्यात्माची आवड होती. दोघेही नियमित नित्य नियमाने परमेश्वराचे नामस्मरण करून गुण्यागोविंदाने दोघेही राहत होते. आपले आयुष्य व्यथित करत होते. ७ जुलै रोजी रात्री सर्व कुटुंबियांनी सोबत जेवण केले. त्यानंतर सर्व झोपले. ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन येथे फोन केला.
मी आणि माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणालाही कारणीभूत धरू नये, अशी माहिती पोलीस स्टेशनमध्ये दिली. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना धक्का बसला. यामुळे पोलिसांनी तात्काळ लोहटार गाठले. माहितीनुसार ईश्वर पाटील आणि प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना १० जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेस काही तास उलटत नाही तोच सकाळी ८ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनी देखील जगाचा निरोप घेतला. घटनेची पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दाम्पत्यास दोन मुले एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत. ईश्वर पाटील आणि प्रमिलाबाई पाटील त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली असुन त्या चिठ्ठीत आम्ही दोघेही जीवनास कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. आमच्या मृत्युला कोणासही कारणीभूत धरू नये, असा चिठ्ठीत आशय आहे.
हि चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान सर्व काही सुरळीत असताना दांपत्याने एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. संसाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटलं असलं तरी नेमकं दांपत्याला असा काय त्रास होता की ज्यामुळे त्यांना थेट मृत्यूला सामोरे जावं लागलं असे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. अतिशय शोकाकुल वातावरणात दांम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी पती-पत्नीच्या निघालेल्या या अंत्ययात्रेने लोहटार गाव सुन्न झाले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.