• Fri. Mar 6th, 2026
    Monsoon 2023: मान्सून रखडला, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, थोडे दिवस थांबा, कारण…

    म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड: ‘अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी,’ असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. सिल्लोड येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

    कापूस पीक सुधारित लागवड तंत्रज्ञानाबाबत; तसेच पेरण्या उशिरा होत असल्याने कापूस आणि इतर पीक लागवड; तसेच खतांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देशदेखील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    ग्रीन टीव्ही इंडिया, धनुका ॲग्रीटेक, सिएट लिमिटेड; तसेच महाराष्ट्र सरकार कृषी विभाग यांच्यातर्फे शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात कापूस पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनाबाबत सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना सत्तार बोलत होते. या वेळी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र; तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने शेतकऱ्यांना राळ पिकाचे वाटप सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

    या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, ग्रीन टीव्हीच्या व्यवस्थापक अंशु कुमार, धनुकाचे कार्यकारी संचालक सुबोध गुप्ता, सिएटचे क्षेत्र प्रमुख दिलीप माळेकर, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, डॉ. दत्तात्रय भंवर यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    ‘शेती हा उद्योग व्हावा आणि यातून शेतकरी सक्षम व्हावा यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले असून, त्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. एक रुपयांत पीकविमा, केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये मानधन असे अनेक महत्त्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले आहेत,’ असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

    मका संशोधन केंद्र लवकरच:

    सोयगाव तालुक्यात मका आणि कापूस पिकांची सर्वाधिक लागवड होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र उभारणीला सरकारने मान्यता दिली. त्याच पद्धतीने तालुक्यात कापूस उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. सदरील प्रस्ताव मंजुरी स्तरावर असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. सोयगाव येथे कृषी महाविद्यालय, सिल्लोड तालुक्यात रेशीम महाविद्यालय, कृषी औद्योगिक क्षेत्र, कृषी भवन असे अनेक विकासकामे मतदारसंघात गतिमान पद्धतीने करणार असल्याचेही त्यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed